कल्याण: मध्य रेल्वेच्या दिवा रेल्वे स्थानकातील गृह फलाटाचे काम (होम प्लॅटफाॅर्म) गेल्या वर्षभरापासून रखडले आहे. हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली केल्या जात नसल्याने प्रवासी, रेल्वे प्रवासी संघटना तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. दिवा रेल्वे स्थानकात गेल्या वर्षभरापासून गृह फलाटाची (होम प्लॅटफाॅर्म) बांधणी करण्यात येत आहे. दिवा रेल्वे स्थानकातील पश्चिम बाजूला हा फलाट आहे. या फलाटाची बांधणी करण्यापूर्वी रेल्वेने या जागेची मोजणी करून फलाट बांधण्यात येत असलेली जागा रेल्वेची असल्याचे नक्की केले होते. या फलाटाची बहुतांशी बांधणी झाल्यानंतर दिवा गावातील एका ग्रामस्थाने या फलाटाची कल्याण बाजूकडील काही जमीन आपल्या मालकी हक्काची असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडे केला. या जागेचा मोबदला दिल्या शिवाय आपण याठिकाणी फलाटाची बांधणी करून देणार नाही, अशी अडवणुकीची भूमिका घेतली.

दिवा रेल्वे स्थानकातील गृह फलाटाचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. लोकलचे सहा डबे उभे राहतील एवढ्या जागेत फलाटाची बांधणी सुरू असताना खासगी जमीन मालकाने हरकत घेतली. त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांना ते काम आता वर्ष होत आले तरी पूर्ण करता आले नाही. फलाटाची जागा ही रेल्वेच्या मालकीची आहे अशी ठाम भूमिका रेल्वे अधिकाऱ्यांंनी घेतली आहे. तर जमीन मालक ती जागा आपल्या मालकीची आहे असा दावा करून आहे. या वादात दिवा रेल्वे स्थानकातील गृहफलाटाचे काम रखडले आहे.

हेही वाचा : ठाणे जिल्ह्यात डेंग्यू, मलेरियासह स्वाईन फ्ल्यूची साथ; ठाणे शहरात स्वाईन फ्ल्यूचे १३१ रुग्ण

या रखडलेल्या फलाटाच्या एका बाजुने प्रवासी उतरतात. हा फलाट बांधून पूर्ण झाला असता तर या फलाटाच्या दोन्ही बाजुने प्रवाशांना उतरता आले असते. सध्या सहा डबे सोडून उर्वरित लोकल डब्यातील प्रवासी रखडलेल्या फलाटाच्या दो्न्ही बाजुने उतरतात. सहा डबे असलेल्या भागात फलाटाचे बांधकाम रखडले असले तरी अनेक प्रवासी लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी रखडलेल्या फलाटाच्या बाजुने लोकलमध्ये चढतात आणि उतरतात. यामुळे प्रवाशांचा अपघात होण्याची भीती आहे. अनेक वेळा अशी जोखीम घेऊन लोकलमध्ये चढणारे, उतरणारे प्रवासी पडून जखमी होतात, असे प्रवाशांनी सांगितले. दिवा रेल्वे स्थानकातील प्रवासी संंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रखडलेल्या फलाट भागातील जमिनीचा वाद मिटवण्याचे काम सुरू आहे. त्यानंंतर रखडलेल्या फलाटाचे काम पूर्ण केले जाईल, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.