कल्याण : कचरा वेळेवर उचलला जात नसल्याच्या नागरिकांच्या वाढत्या तक्रारी विचारात घेऊन कल्याण डोंबिवली पालिकेच्या घनकचरा विभागाने कल्याणमधील ब (खडकपाडा परिसर), जे आणि ड प्रभागात (कल्याण पूर्व) कचरा उचलण्याचे काम करणाऱ्या मे. आर. ॲन्ड बी कंपनीचा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालिकेच्या सात प्रभागांमध्ये कचरा उचलण्याचे काम करण्यासाठी एक नवीन खासगी एजन्सी नेमण्यात आली आहे. या एजन्सीचे काम लवकरच सुरू होणार आहे. हे काम सुरू होण्यापूर्वी तीन प्रभागांमधील कचरा उचलण्याचे काम पालिकेचे सफाई कामगार करणार आहेत, असे उपायुक्त पाटील यांनी सांगितले. पालिकेकडून ब, जे आणि ड प्रभागातील कचरा उचलण्याचे काम मे. आर ॲन्ड बी कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीकडून कचरा उचलण्यासाठी जु्नी वाहने वापरली जात होती. ती सतत बंद पडत होती. ठेकेदाराला नोटिसीद्वारे सुधारण्याची संधी देऊनही त्यांच्यात बदल न झाल्याने पालिकेने या कंपनीचा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेतला, असे उपायुक्त पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा…ठाणे-बोरिवली मार्गाच्या कामाला होणार जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा

पालिकेकडून सफाई

ब, जे आणि ड प्रभागात नवीन एजन्सीचे काम सुरू होईपर्यंत पालिकेचे सफाई कामगार आणि यंत्रणेकडून कचरा उचलण्याचे काम केले जाणार आहे. हे काम सकाळच्या सत्राऐवजी दुपारी दोन ते रात्री १० वेळेत केले जाणार आहे. काही दिवसांपासून कल्याणमध्ये कचरा उचलण्याची कामे वेळेवर होत नसल्याने नागरिकांनी पालिकेकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सोसायटी आवारात कचऱ्याचे डबे तीन तीन दिवस पडून होते. एकीकडे कल्याण, डोंबिवली शहरे शून्य कचरा मुक्त करण्याकडे वाटचाल करत असताना शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत होते.

हेही वाचा…अनधिकृत मासेमारी आणि नौकांवर ड्रोनद्वारे नजर

लवकरच नवीन एजन्सी

अ (टिटवाळा), ब (खडकपाडा) आणि क (बाजारपेठ) हे तीन प्रभाग वगळता उर्वरित सात प्रभागांमधील कचरा संकलन, वाहतूक आणि कचरा प्रक्रियेसाठी नवीन एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे. या एजन्सीचे काम येत्या अडीच महिन्यात सुरू होईल. त्यानंतर या सातही प्रभागांमधील सफाई कामगार, कचरा वाहतूक यंत्रणा अ, ब आणि क प्रभागांमध्ये वळविण्यात येणार आहे, असे पाटील यांनी सांगितले. हे तिन्ही प्रभाग सर्वाधिक कचऱ्याचे प्रभाग म्हणून ओळखले जातात. नवीन एजन्सीचे काम सुरू होईपर्यंत कचरा संकलन, कचरा वहन वाहनाला उशिरा झाला तर नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे. कचरा नियमित उचलला जाणार आहे. कचरा उचलला नाही म्हणून कचरा रस्त्यावर टाकू नका. अतुल पाटील उपायुक्त, घनकचरा विभाग.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan dombivli municipality on complaint of non collection of garbage contract of a b company cancelled sud 02