कल्याण – दिवाळी सणाच्या खरेदीसाठी कुटुंबीयांसह बाहेर पडलेले नागरिक, त्यांची बाजारपेठेत आणलेली आणि रस्तोरस्ती उभी केलेली वाहने. याचवेळी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या गर्दीचा लाभ उठविण्यासाठी उमेदवारांकडून काढण्यात आलेल्या प्रचार मिरवणुका. या खरेदीचा उत्साह आणि प्रचार मिरवणुकांमुळे दोन दिवसांपासून दररोज संध्याकाळी चार वाजल्यापासून कल्याण, डोंबिवली शहरे वाहन कोंडीत अडकत आहेत.

या कोंडीचा सर्वाधिक फटका संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाला बसत आहे. अनेक रिक्षा चालक संध्याकाळच्या कोंडीमुळे त्रस्त आहेत. या वाहन कोंडीमुळे अधिकच्या प्रवासी फेऱ्या मारणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक रिक्षा चालक सकाळ ते संध्याकाळी प्रवासी फेऱ्या मारून संध्याकाळी पाच नंतर वाहन कोंडीचा त्रास नको म्हणून रिक्षा बंद ठेवणे पसंत करत आहेत. या बंदचा प्रवाशांना फटका बसत आहे. कामावरून परतल्यावर अलीकडे रिक्षा वाहनतळावर रिक्षा नसल्याने प्रवाशांना रिक्षेची वाट पाहत बसावी लागते. एक रिक्षा आली तर त्यामागे १० ते १५ प्रवासी धावतआहेत. डोंबिवलीतून काटई, पलावाकडे जाणाऱ्या प्रवाशांचे सर्वाधिक हाल सुरू आहेत.

हेही वाचा >>>कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर प्रवाशाला चोरट्यांनी लुटले

डोंबिवली पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक भागात सुसज्ज वाहनतळ नाही. बाजारपेठेत खरेदीसाठी आलेले नागरिक रस्त्याच्या दुतर्फा मोटार, दुचाकी उभी करून खरेदीसाठी बाजारात जात आहेत. रस्त्याच्या कडेची ही वाहने वाहतुकीला मोठा अडथळा येत आहेत.

कल्याण, डोंबिवलीत रस्तोरस्ती पालिकेच्या परवानग्या न घेता, राजकीय मंडळींच्या समर्थकांनी फटाके विक्रीची दुकाने सुरू केली आहेत. या दुकानांच्या मंडपांचे कोपरे अनेक ठिकाणी चौक, रस्त्याला अडथळा येत आहेत. या फटाके विक्रीच्या दुकानदारांना रिक्षा चालक, प्रवासी काही बोलला तर ते त्याला दादागिरी करत असल्याच्या तक्रारी आहेत. बहुतांशी फटाके विक्रेते राजकीय मंडळींचे समर्थक असल्याने पालिका अधिकाऱ्यांना अशा विक्रेत्यांवर कारवाई करताना दबावामुळे हात आखडता घ्यावा लागत आहे.

हेही वाचा >>>भाजपचे नेते उमेदवारीसाठी शिंदे सेनेत

डोंबिवलीतील कोंडीवर आठ दिवसात उपाययोजना करा, असे आदेश वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी डोंंबिवली वाहतूक विभागाला दिले आहेत. वाहनांची संख्या दामदुप्पट, अरूंद रस्ते, वाहतुक पोलिसांचे कमी मनुष्यबळ त्यामुळे वाहतूक पोलिसांना वाहन कोंडी सोडविताना कसरत करावी लागत आहे.

कल्याण पश्चिमेतील महमद अली रस्ता, शिवाजी चौक परिसर विक्रेत्यांनी गजबजून गेला आहे. त्यात रस्त्यावरील वाहनांची वर्दळ भर घालते. त्यामुळे शिवाजी चौक, सहजानंद चौक परिसर सकाळपासून वाहन कोंडीत अडकलेला असतो. कल्याणमध्ये मुरबाड, शहापूर भागातून वाहने घेऊन किरकोळ विक्रेते खरेदीसाठी येतात. ही वाहने दुकानांसमोर उभी करून व्यापारी खरेदी करतात. त्यामुळे ही वाहने कोंडीत मोठी भर घालतात. या सततच्या वाहन कोंडीमुळे अनेक रिक्षा चालकांना पाठदुखी, तणावाचे आजार झाले आहेत.