कल्याण : कल्याण लोकसभा मतदार संघातील शहरी, ग्रामीण भागात पक्षीय कार्यकर्त्यांनी दारात येण्यापूर्वीच मतदारांनी सकाळपासून मतदान केंद्राबाहेर स्वयंस्फूर्तीने रांगा लावल्या होत्या. उन्हाचा चटका टाळण्यासाठी नागरिक विशेषत ज्येष्ठ नागरिक, आजी, आजोबा सकाळीच हातातील कापडी पिशवीत मतदान केंद्रावर लागणारे निवडणूक ओळखपत्र, आधारकार्ड, सोबत पाण्याची बाटली घेऊन मतदानासाठी दाखल झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरकारी, निमसरकारी कार्यालये, खासगी आस्थापनांना शासनाने निवडणुकीनिमित्त विशेष सुट्टी दिल्याने नोकरदार वर्ग कुटुंबीयांसह मतदान केंद्रावर दाखल झाले होते. सकाळची वेळ असूनही हवेतील आद्रतेमुळे घामाच्या धारांनी मतदार नागरिक ओथंबून गेले होते. उन्ह होण्याच्या आत मतदान करू या विचारातून प्रत्येक मतदार घराबाहेर पडल्याने पावणे सात वाजल्यापासून नागरिक कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ भागात मतदान केंद्रांबाहेर रांगा लावून होते. उल्हासनगर, कळवा मुंब्रा भागात व्यापारी वर्ग अधिक आहे. त्यामुळे या भागात तसेच, कल्याण ग्रामीण भागात सकाळी दहा वाजल्यानंतर मतदार केंद्रांवर गर्दी दिसू लागली.

हेही वाचा…ऐन मतदानाच्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक रविवारच्या वेळापत्रकाने

मतदान केंद्रांवर अपंग, ज्येष्ठ नागरिक, वृध्द, अंध, विशेष व्याधीग्रस्तांना मतदान करण्याची तातडीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत होती. प्रत्येक केंद्राबाहेर पाणी, आसन व्यवस्थान करण्यात आली होती. काही केंद्रांच्या बाहेर सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले होते. मतदाना नंतर नवतरूण मतदार, वयोवृध्द मंडळी सेल्फी पॉईंटमध्ये येऊन स्वतःची प्रतिमा काढत होते. मतदान केल्याचा उत्साह नवतरूण मतदारांच्या चेहऱ्यावर होता.

शासनाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा यावेळी चांगला परिणाम झाल्याचे दिसून आले. पक्षीय कार्यकर्त्यांची वाट न पाहता किंवा घरी मतदार क्रमांकाची पावती आली नसली तरी मतदार स्वतःहून केंद्रावर दाखल झाले होते.

डोंबिवली-कल्याण

डोंबिवली कल्याणमधील मतदार सकाळी पावणे सात वाजल्यापासून मतदान केंद्राबाहेर मतदानासाठी रांगा लावून होते. डोंबिवली पूर्व भागात सीकेपी सभागृहातील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने येथील केंद्र पावणे आठ वाजता मतदानासाठी सज्ज झाले. तोपर्यंत या केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मंजुनाथ शाळेतील एका यंत्रात बिघाड झाला. तो तातडीने दुरुस्त करून मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. कल्याण, डोंबिवलीतील सुमारे ६० हजाराहून अधिक एमटी अनुक्रमिकेतील मतदारांनी नावे गायब असल्याची चर्चा राजकीय पदाधिकारी करत होते.

या वृत्ताला शासकीय दुजोरा मिळाला नाही. मागील अनेक वर्ष मतदार करणाऱ्या अनेक मतदारांची नावे यावेळी मतदार यादीतून गायब आहेत. एकाच घरातील मुलांची नावे यादीत आहेत पण आई-बाबांची नावे वगळण्यात आली आहेत. यामुळे अनेक मतदार संतप्त आहेत.

हेही वाचा…“मोदींना जितक्या शिव्या द्याल..”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला, विधानसभेच्या जागावाटपाबाबत म्हणाले..

डोंबिवलीतील मोठागाव शाळा क्रमांक २० येथे मतदान केंद्र ३६ वर एका मतदाराला चक्कर आली. त्याच्यावर तातडीने अत्यावश्यक उपचार करण्यात आले. या मतदाराने मतदान न करताच केंद्रातून काढता पाय घेतला. मतदान केंद्रांच्या बाहेर मतदारांचे यादीतील अनुक्रमांक शोधण्यासाठी पक्षीय कार्यकर्ते पहाटे पासून बसले होते.

कल्याणमध्ये वायेलनगर भागात एका तरूणीचे नाव यादीत नव्हते. मतदान न केल्यास कर्मचाऱ्यांचे तीन दिवसांचे वेतन कापण्याची तंबी कार्यालयाने दिल्याने ही तरूण अस्वस्थ होती. यादीत नाव नसलेले मतदार विविध केंद्रांवर जाऊन आपले नाव कोणत्या यादीत आहे का याचा शोध घेत होते.

विदेशातून भारतात

इंग्लंडमध्ये निवास असलेले पर्जन्य तज्ज्ञ लक्ष्मीकांत आणि निलीमा चिमोटे या दाम्पत्याने खास निवडणुकीसाठी भारतात येऊन डोंबिवलीतील केंद्रावर अरूणोदय स्वामी शाळा, डॉन बॉस्को केंद्रावर मतदान केले. १९५२ पासून प्रत्येक निवडणुकीत मतदान करणाऱ्या डोंबिवलीतील संस्कृत अभ्यासक सुमित्रा गुर्जर (९०) यांनी स. वा. जोशी शाळेत, कल्याणमधील डॉ. सारंगधर (९६),मधुकर काळे (९८) यांनी १९५२ पासून मतदान केले आहे. सज्ञान झाल्यापासून मतदानाचा प्रत्येक वेळी हक्क बजावणारे शीतल आणि शशांक देशपांडे यांचीही नावे यादीत गायब होती. माजी खासदार राम कापसे यांचे चिरंजीव डॉ. आनंद, स्नुषा जान्हवी, काक हरदास यांच्या काही कुटुंबीयांचीही नावे मतदार यादीतून गायब आहेत.

हेही वाचा…“लीन झालेत, आता विलीनही होतील”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला; काँग्रेसचा उल्लेख करत म्हणाले…

मुंब्रा-ग्रामीणमध्ये शांतता

कल्याण ग्रामीण मतदारसंघातील कळवा-मुंब्रा, ग्रामीण भागातील मतदार शांतपणे रांगा लावून मतदान करत होते. मुंब्रातील प्रत्येक केंद्रावर सकाळपासून महिला पुरूषांच्या रांगा लागल्या होत्या. २७ गावे, १४ गावांमध्ये झाडाखालील सावलीत बसून ग्रामस्थ मतदारांना यादीतील क्रमांकाची माहिती देत होते. मलंगपट्टी, अंबरनाथ ग्रामीण भागात केंद्रांबाहेर रांगा लागल्या होत्या. पाली-चिरड-पोसरी केंद्रावर शांततेत मतदान सुरू असल्याचे पोलीस पाटील नितीन ठाकरे यांनी दिली.

नेते गायब

कल्याण लोकसभा मतदारसंघात यापूर्वी निवडणुकीच्यावेळी रस्त्यावर दिसणारी आमदार, खासदार, पक्षीय नेते यांची मतदान टक्का वाढविण्यासाठीची धावपळ यावेळी दिसत नव्हती. कल्याण पूर्वेत भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर निवडणूक असली की तुफान गर्दी असायची. सोमवारी गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर शुकशुकाट होता. शहरप्रमुख महेश गायकवाड मतदारांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील होते. सर्व पक्षीय माजी नगरसेवक, पदाधिकारी मात्र आपल्या मतदार केंद्रात ठिय्या मांडून होते.

हेही वाचा…कल्याण, डोंबिवलीतून गावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल; निवडणूक कामासाठी एस. टी. बस सोडल्याने दोन तास प्रतिक्षा करून बसचा पत्ता नाही

नेत्यांचे मतदान

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कुटुंबीयांसह डोंबिवलीत के. बी. विरा शाळेत मतदान केले. महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी कुटुंबीयांसह मतदान केले. माजी मंत्री जगन्नाथ पाटील, पुण्याला स्थलांतरित झालेले लेखक सुरेश देशपांडे मतदानासाठी डोंबिवलीत आले आहेत.

हेही वाचा…एक केळ जास्त घेतल्याने विक्रेत्यांचा ग्राहकांवर हल्ला

डोंबिवलीत सरबत

कडोंमपा आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग इतर सहकारी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून डोंबिवलीतील जोशी शाळा, मंजुनाथ आणि ओंकार शाळा, शास्त्री सभागृहात मतदारांसाठी सरबताची व्यवस्था केली होती. काही सामाजिक संस्थांनी मतदान केंद्रांच्या बाहेर मतदारांना पाणी, सरबताची स्वतःहून सोय केली होती.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan lok sabha voters in urban and rural areas spontaneously lined up names of many voters disappeared from the list psg
Show comments