डोंबिवली – मध्य रेल्वेच्या कसारा-कर्जत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावरील लोकल सोमवारी सकाळपासून १० ते १५ मिनीट उशिराने धावत आहेत. पावसामुळे लोकल उशिराने धावत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

सोमवार कामावर जाण्याचा पहिलाच दिवस आणि त्यात लोकल उशिराने धावत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. लोकल वेळेवर धावत नसल्याने मिळेल ती लोकल पकडून कामावर जाण्याची घाई प्रवाशांना आहे. त्यामुळे फलाटावर येणाऱ्या लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडत आहे. नियमित लोकल वेळेवर नसल्याने कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, बदलापूर, अंबरनाथ रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी आहे. कर्जत, कसारा रेल्वे स्थानकांकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या सकाळच्या लोकल अतिजलद असतात. या लोकलने प्रवास केला की मुंबईतील कार्यालयीन वेळ अचूक गाठता येते. त्यामुळे या लोकल पकडण्याला प्रवाशांचे प्राधान्य असते. या अति जलद लोकल सोमवारी उशिराने धावत असल्याने प्रवाशांना अर्ध गती, सर्व स्थानकांवर थांबा घेणाऱ्या लोकलने प्रवास करावा लागतो.

हेही वाचा – तानसा धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

हेही वाचा – ठाण्यात विकासकाने ग्राहकांकडून पैसे घेऊन ग्रहप्रकल्पाची उभारणी केलीच नाही, शेकडो ग्राहक दहा वर्षांपासून घराच्या प्रतीक्षेत

कर्जत, कसाराकडून येणारे अनेक प्रवासी घाटकोपर रेल्वे स्थानकात उतरून तेथून मेट्रोने पश्चिम उपनगरात, काही हार्बर मार्गाने नवी मुंबई, पनवेल भागात जातात. या प्रवाशांनाही लोकल उशिराचा फटका बसला आहे. लोकल उशिराचा लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका बसला आहे.

Story img Loader