CM Eknath Shinde in Kopari Pachpakhadi Vidhan Sabha Constituency : महाराष्ट्रातील सर्वांत महत्त्वाचा, संपूर्ण राज्याचं लक्ष असलेला मतदारसंघ म्हणजे कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघ. कारण याच मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडून आले आहेत. २००८मध्ये ठाणे जिल्ह्यातील मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर कोपरी पाचपाखडी हा मतदारसंघ वेगळा झाला. तेव्हापासून एकनाथ शिंदे येथील आमदार राहिले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानलो जातो. परंतु, यंदा येथे सर्वांत मोठा रणसंग्राम रंगण्याची शक्यता आहे.

साधारण तीन वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात उलथापालथ झाली. सत्ताधारी शिवसेनेत फूट पडली. तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना आपल्यासोबत घेऊन भाजपाशी सूत जुळवलं. एवढ्यावरच न थांबता त्यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावरही दावा केला. न्यायालयीन लढाईत त्यांनी पक्षचिन्ह आणि पक्षनावावर हक्कही मिळवला. यामुळे राजकीय इतिहासातील ही सर्वांत मोठी फूट मानली जातेय. या फुटीमुळे फक्त दोन गट निर्माण झाले नाहीत तर राज्याच्या राजकारणात मोठं वैर निर्माण झालं आहे.

या मोठ्या राजकीय उलथापालथीत एकनाथ शिंदे केंद्रस्थानी होते. त्यामुळे त्यांचा मोठा मतदारवर्ग असला तरीही त्यांच्याविरोधात रोषही तितकाच आहे. परिणामी कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघात यंदा कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा >> Ovala Majiwada Sabha Constituency : उच्चभ्रू वस्तीच्या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार?

राजकीय गणितं बदलल्याने एकनाथ शिंदेना कठीण जाणार निवडणूक?

२००९ च्या आधीपासून ठाणे शहर कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात यायचा. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या नावावर येथे शिवसेनेला मोठ्या प्रमाणात मते मिळत होती. २०१९ पर्यंत एकनाथ शिंदे यांनी येथे राजकीय विरोधकच शिल्लक ठेवले नव्हते. त्यामुळे येथे त्यांना कोणत्याही पक्षाचा थेट सामना करावा लागला नव्हता. परंतु, आताची राजकीय गणितं वेगळी असल्याने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. अर्थात हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने महाविकास आघाडीकडूनही ठाकरे गटाला ही जागा सोडली जाण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडून कोणता उमेदवार उभा केला जातोय हे पाहावं लागेल.

महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान

महाविकास आघाडीसाठी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा ठरणार आहे. या मतदारसंघातून पारंपरिक आमदाराला म्हणजेच एकनाथ शिंदे यांना हरवण्यासाठी ठाकरे गटाकडे मोठं आव्हान असणार आहे. हे आव्हान पेलवण्यासाठी ठाकरे गटाला तितक्याच तोडीस तोड उमेदवार उभा करावा लागेल.

दोन टर्ममध्ये किती मते मिळाली होती?

२०१४ मध्ये एकनाथ शिंदे यांना १ लाख मते मिळाली होती. तर, भाजपाचे संदीप लेले आणि काँग्रेसचे मोहन तिवारी यांचा मोठ्या फरकाने त्यांना पराभव केला होता. तर, २०१९ मध्ये एकनाथ शिंदे यांना १ लाख १३ हजार मते मिळाली होती. तर, काँग्रेस आणि मनसेच्या उमेदवारांचा मोठ्या फरकाने धोबीपछाड केला होता.