ठाणे : राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघामध्ये जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला असा सामना रंगला असतानाच, या मतदार संघातील कळवा- खारेगाव भागातील गृहसंकुलांच्या पदाधिकाऱ्यांनी आव्हाड यांना पाठविलेले पत्र सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे. त्यात जितेंद्र आव्हाड तुम्ही प्रचार करू नका…तुमचे काम बोलतय अशा आशयाचा मजकूर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर ठाणे जिल्ह्यातही पक्षात उभी फुट पडली. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांची साथ दिली तर, आव्हाड यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे यांनी अजीत पवार यांची साथ दिली. तेव्हापासून या दोन्ही गटात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची लढाई सुरू आहे. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघातून जितेंद्र आव्हाड हे तीनदा निवडुण आले आहेत. या मतदार संघातून राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडुण येतात. यामुळे हा परिसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत हा बालेकिल्ला कोणात्या पवारांचा असेल, हे स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा >>>डोंबिवली : फडके छेद रस्त्यावरील आगरकर काँक्रीट रस्त्याच्या संथगती कामामुळे वाहन कोंडी

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षाने जितेंद्र आव्हाड यांना पुन्हा निवडणकीच्या रिंगणात उतरविले आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी (अजीत पवार) या पक्षाने नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे येथे गुरू-शिष्याची लढाई होणार आहे. या दोन्ही नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्ती प्रदर्शन केले असून त्याचबरोबर दोन्ही नेते मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी मेळावे घेत आहेत. असे असतानाच, या मतदार संघातील कळवा- खारेगाव भागातील गृहसंकुलांच्या पदाधिकाऱ्यांनी आव्हाड यांना पाठविलेले पत्र सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे. त्यात जितेंद्र आव्हाड तुम्ही प्रचार करू नका…तुमचे काम बोलतय अशा आशयाचा मजकूर आहे. वास्तुआनंद, गोपीनाथ टाॅवर, चावंडाई रेसीडेन्सी, वेदांत पार्क, साई विहार, राज पार्क, वैष्णवीधाम, विराट, समृद्धी हाईट यासह इतर संकुलांनी असे पत्र आव्हाड यांना पाठविले आहे.

काय म्हटलयं पत्रात…

गेले अनेक दिवस आम्ही आपणास गल्लीबोळात प्रचार करताना पाहत आहोत. आपण मागील १५ वर्षे प्रामणीकपणे एवढे काम करीत आहात आणि आमच्या पारसिक परिसराचा विकास केल्यानंतर आपण गल्लीबोळात प्रचार करत फिरणे आम्हांला पाहवत नाही. तरी आपणास प्रचार करण्याची आवश्यकता नाही. आम्ही नागरीक आपणा सोबतच आहोत. त्यामुळे आमच्या सोसायटीने निर्णय घेतला आहे की आपणास एकमताने मतदान करणार. आपले प्रचारक आम्हीच आहोत. ही निवडणूक आता आम्ही आमच्या हातात घेतली आहे. ही निवडणुक आता लोकचळवळ झाली असुन केलेल्या कामाची पावती देण्याची हीच वेळ आहे, असे संकुलांच्या पत्रात मजकूर आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Letter from kalwa kharegaon complex officials regarding the work of jitendra awad amy