कल्याण – महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारे विकासविरोधी, शिवसेनाप्रमुखांचे विचार आणि धनुष्यबाण ज्यांनी काँग्रेसच्या दावणीला बांधले, असे महाविकास आघाडीचे सरकार आपण उलथवून टाकले. असे केले नसते तर कल्याण पश्चिमेसह महाराष्ट्रात विकासाची गंगा आज निर्माण झाली नसती, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी येथे महाविकास आघाडीच्या सरकारवर केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविकास आघाडी सरकारच्या काळात औद्योगिक क्षेत्रात देशात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता. महायुतीचे सरकार राज्यात येताच पुन्हा उद्योग, व्यवसाय, गुंतवणूक, नवउद्यमी, पायाभूत सुविधांमध्ये राज्य प्रथम क्रमांक आणण्यात यशस्वी झाले. राज्यातील आघाडीचे सरकार उलथून टाकले नसते तर आपण आणखी अधोगतीकडे गेलो असतो. त्यामुळे वेळेतच हे सरकार आपण उलथून टाकल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

शिवसेनेची कधीही काँग्रेस होऊ देणार नाही. तसे झाले तर माझे दुकान मी बंद करीन असे शिवसेनाप्रमुख सांगायचे. पण यांंनी मुख्यमंत्री पदाचा मोह, स्वार्थासाठी काँग्रेसच्या दावणीला शिवसेना पक्षाला बांधले, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. शिवसेनाप्रमुखांचे विचार समोर ठेऊन जे घडले ते सहन न झाल्याने आपण महाविकास आघाडीचे सरकार उलथून टाकले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस वातावरण बिघडविण्याचे काम करतेय, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची टीका

महायुतीचे कल्याण पश्चिमेतील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर, कल्याण ग्रामीणमधील महायुतीचे उमदेवार राजेश मोरे यांच्या दोन स्वतंत्र सभांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी कल्याणमध्ये यशवंतराव चव्हाण मैदानात, डोंबिवलीत नांदिवली स्वामी समर्थ मठ भागात घेतल्या.

गाफीलपणा नको

कल्याण ग्रामीणमध्ये सामान्यांच्या सुखदुखात सहभागी होणारा, नाती जपणारा, ती घट्ट ठेवणारा राजेश मोरे यांच्यासारखा हाडाचा शिवसैनिक उमेदवार म्हणून दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी कल्याण ग्रामीण मतदारसंघाने खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांना ८६ हजाराचे मताधिक्य मिळून दिले. मताधिक्याची हीच बैठक कायम ठेऊन आपण उमेदवार मोरे यांना आपण साथ द्यायची आहे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मागच्या वेळेस कल्याण ग्रामीणमध्ये आपण गाफील राहिलो. ती चूक यावेळी करू नका, असे सांगत सभा मोठी आहे म्हणून बेसावध राहू नका. जोमाने काम करून समोरच्या उमेदवारांचे अनामत रक्कम जप्त होईल, या दृष्टीने विकासासाठी काम करा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंनी सांगितले. कल्याण लोकसभेत शिवसेनेचा खासदार आहे. आपला या भागात आमदार पण पाहिजे यासाठी काम करा. आणखी काही बोलायची गरज नाही. यासाठी आपला मुलगा पुरेसा आहे, असे सांगत त्यांनी खा. शिंदे यांचे विकास कामांवरून कौतुक केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 cm eknath shinde slams maha vikas aghadi government in kalyan zws