ठाणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला उद्या म्हणजेच २१ फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षण विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात ३३८ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी यंदा जिल्ह्यातुन १ लाख २१ हजार २४४ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले आहेत.
मागील वर्षी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी ठाणे जिल्ह्यात ३४० परीक्षा केंद्रांवर जिल्ह्यातील १ लाख २१ हजार २२ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असून, ठाणे जिल्ह्यातील १ लाख २१ हजार २४४ विद्यार्थी ३३८ परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. यापैकी ग्रामीण भागात ६० तर महापालिका क्षेत्रात २७८ परीक्षा केंद्र असणार आहेत.
कॉपीमुक्त परीक्षेसाठी सहा भरारी पथके तैनात
जिल्ह्यात दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून ६ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. तालुका तसेच प्रत्येक महापालिका स्तरावर प्रत्येकी दोन बैठे पथकाची नियुक्ती केली आहे. परीक्षा केंद्रांवर या पथकांचे विशेष लक्ष असणार आहे. महसूल विभागांतर्गत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत भरारी पथके नेमण्यात आली आहे. या व्यतिरिक्त जिल्हा स्तरावरील खाते प्रमुख यांनी परीक्षा केंद्राना भेटी देण्यासंदर्भांत नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली.
महापालिका आणि तालुका निहाय्य परीक्षा केंद्र
मनपा /तालुका परीक्षा केंद्र
ठाणे ७४
नवी मुंबई ४०
कल्याण डोंबिवली ८६
कल्याण ग्रामीण ०२
उल्हासनगर २१
अंबरनाथ २१
मुरबाड ११
शहापूर ०९
भिवंडी ३५
भिवंडी ग्रामीण १७
मीरा भाईंदर २२
एकूण ३३८