ग्रामीण भागातील अनेकांना पाच महिन्यांपासून वेतन नाही
बँकखात्याला आधार कार्ड जोडण्याची सक्ती सर्वत्र सुरू असताना याची माहिती आणि तंत्र कळत नसल्याने अंबरनाथ तालुक्यातील वयोवृद्ध, अंध आणि महिला गेल्या पाच महिन्यांपासून आपल्या निराधार योजनेच्या वेतनापासून वंचित आहेत. त्यामुळे अनेक जण आर्थिक संकटात सापडले असून सर्व प्रक्रिया करून लवकरात लवकर दिलासा देण्याची मागणी आता पुढे येत आहे.
अंध, अपंग, शारीरिक व्याधींनी ग्रस्त अशा नागरिकांसह निराधार विधवा व ज्येष्ठ नागरिकांना शासनाकडून आर्थिक मदत म्हणून संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून प्रतिमाह सहाशे रुपये वेतन दिले जाते. तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना आणि ६५ वर्षांवरील आर्थिकदृष्टय़ा निराधार ज्येष्ठांसाठी श्रावणबाळ योजना शासनातर्फे सुरू करण्यात आली. त्यातून प्रत्येक लाभार्थ्यांला दरमहिना ६०० रुपये वेतन दिले जाते. गेल्या पाच महिन्यांपर्यंत अंबरनाथमधील ग्रामीण भागांत शेकडो लाभार्थ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात खासगी बँकेच्या मदतीने वेतन वाटप केले जात होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून जवळपास सर्वच योजनांचा लाभ हा बँक खात्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात ते खाते आधार क्रमांकाला जोडण्याचीही सक्ती करण्यात आली आहे. ती वेळेत पूर्ण न झाल्याने अंबरनाथ ग्रामीण भागातील वांगणी, कुडसावरे, ढोणे या गावांतील अनेक अंध, अपंग, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे पाच महिन्यांचे वेतन रखडले आहे.
अंध आणि वृद्धांना याची माहिती नसल्याने त्यांची ही कामे पूर्ण होऊ शकलेली नाहीत. आधार सक्तीबाबत आमच्यापर्यंत माहिती वेळेत पोहोचली नाही, असे एका वृद्ध महिलेने सांगितले. गेल्या पाच महिन्यांपासून लाभार्थ्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहेत. सरकारी वेतन मिळत नसल्याने अंध, अपंगांना भीक मागून किंवा आपली कला सादर करून उदरनिर्वाह करावा लागत आहे. वृद्धांवर तर वेतनाअभावी उपासमारीची वेळ आली आहे.
याबत तहसीलदार प्रशांत जोशी यांना विचारले असता, गेल्या काही महिन्यांपर्यंत बँकांमार्फत थेट रोख रकमेच्या माध्यमातून हे वेतन दिले जात होते. मात्र आता थेट बँक खात्यात हे जमा होत असून आधार नोंदणी न केल्याने हा प्रकार झाला असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र वैयक्तिक तक्रार घेऊन येणाऱ्यांच्या प्रत्येकाचा प्रश्न मिटवला असून इतरांचाही प्रश्न येत्या काही दिवसांत मिटेल, असे त्यांनी सांगितले.