लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणारे माजी नगरसेवक मिराज खान यांच्यासह पदाधिकारी बिलाल शेख (जसबीर ) आणि राजनाथ यादव यांनी नुकताच शरद पवार गटात पक्ष प्रवेश करत घरवापसी केली आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षला रामराम ठोकत अजीत पवार गटात प्रवेश करणारे माजी महापौर नईम खान यांनीही शरद पवार गटात प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धक्का दिल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिकेत एकूण नगरसेवकांची संख्या १३१ इतकी आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेचे ६७ तर, राष्ट्रवादीचे ३४ नगरसेवक निवडुण आले होते. पालिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्षाची ओळख होती. तसेच राष्ट्रवादीच्या निवडुण आलेल्या ३४ पैकी २६ नगरसेवक कळवा-मुंब्रा भागातील होते. या भागाचे प्रतिनिधीत्व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे करतात. हा मतदार संघ त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादीतील फुटीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांची तर, जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी अजित पवारांची साथ दिली. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात नजीब मुल्ला हे निवडणुक लढविणार असल्याचे बोलले जात असून यातूनच कळवा मुंब्य्रात गेल्या काही महिन्यांपासून पक्ष फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे.

आणखी वाचा-ठाण्यात हिट अँड रन, भरधाव मर्सिडीज कारची तरूणाला धडक, अपघातात तरुणाचा मृत्यू

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा गडाला सुरूंग लावत आठ नगरसेवकांना पक्ष प्रवेश दिला होता. त्यापाठोपाठ काँग्रेस नेते, माजी महापौर नईम खान, त्यांचे चिरंजीव व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक मिराज खान यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. राष्ट्रवादीचा मुंब्य्रातील युवा नेता बिलाल शेख (जसबीर ) याने ही अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्याच्या वाढदिवसानिमित्ताने अजित पवार गटाने सर्वत्र फलक लावले होते. या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने अजित पवार गटाने जितेंद्र आव्हाड यांना धक्का दिला होता. परंतु काही महिन्यांतच नईम खान, मिराज खान, राजनाथ यादव, जसबीर यांनी शरद पवार गटात प्रवेश करत घरवापसी केली असून या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धक्का दिल्याचे चित्र आहे.