लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : येथील एमआयडीसीतील फेज दोन मधील सुदेवी केमिकल कंपनीत रविवारी रात्री एका १७ वर्षाच्या अल्पवयीन कामगाराला विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी या मृत कामगाराच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी या कंपनीचे मालक, चालकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

सूर्यदेवकुमार छठु साह (१७) असे मृत अल्पवयीन कामगाराचे नाव आहे. जितेंद्र अग्रवाल हे सुदेवी केमिकल कंपनी चालकाचे नाव आहे. मयत सूर्यदेवकुमार याचा भाऊ बिकीकुमार साह (२१) याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साह कुटुंब कल्याण पूर्वेतील पिसवली भागातील शांतीनगर झोपडपट्टीत राहते.

आणखी वाचा-आनंद नगर, मुलुंड कचराभूमीवर कलाकेंद्र आणि रुग्णालय बनवा, मुलुंड ठाण्याच्या वेशीवरील रहिवाशांचे स्वाक्षरी अभियान

पोलिसांनी सांगितले, तक्रारदार बिकीकुमार याचा भाऊ मयत सूर्यदेवकुमार साह हा डोंबिवली एमआयडीसीतील फेज दोन मधील सुदेवी केमिकल कंपनीत कामाला होता. रविवारी रात्रीच्या वेळेत कंपनीत काम करत असताना सूर्यदेवकुमार याला विजेचा जोरदार धक्का लागला. त्याचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती साह कुटुंबीयांना कळताच ते कंपनीत दाखल झाले.

कंपनी मालक, चालक यांच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याने त्यांनी कंपनी मालक, चालकांविरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. अल्पवयीन कामगारास कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा आहे, तरी सुदेवी कंपनी व्यवस्थापनाने त्याला कामावर कसे घेतले असे प्रश्न पोलिसांकडून उपस्थित करण्यात आले आहेत. अल्पवयीन मुलास कामावर ठेऊन कंपनीने निष्काळजीपणाचे कृत्य करून, सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेतल्याने सूर्यदेवकुमार याचा मृत्यू झाल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सानप या प्रकरणाचा तपास करत आहेत.

आणखी वाचा-पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत धमकी

सुदेवी कंपनीत अल्पवयीन कामगार काम करत आहे हे कंपन्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या औद्योगिक निरीक्षक, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभाग अधिकाऱ्यांच्या का निदर्शनास आले नाही. त्यांनी या कंपनी मालकावर वेळीच का कारवाई केली नाही, असे प्रश्न या मुलाच्या मृत्युच्या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.