गेल्या चार वर्षांतील निधीतून गटार, शौचालये, चौकांचीच कामे
गटार, मलवाहिनी बांधणे..शौचालये उभारणे.. जलवाहिनी टाकणे.. रंगमंच बांधणे.. चौकाचे सुशोभीकरण करणे.. महापालिका उद्यानात ज्येष्ठ नागरिक कट्टा बांधणे.. बहुउद्देशीय समाज मंदिर बांधणे.. कारंजे बसवणे.. अशी कामे एखाद्या नगरसेवकाच्या प्रगतिपुस्तकात निश्चितच उठून दिसली असती. परंतु ठाणे जिल्हय़ातील खासदारांनी आपल्या निधीचा पुरेपूर वापर या कामांसाठी केल्याने ठाणेकरांचे दिल्लीत प्रतिनिधित्व करणारे खासदार अजूनही गल्लीतील कामांमध्येच रमले असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागाकडून खासदार निधीच्या कामांची यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. ठाणे, कल्याण आणि भिवंडीच्या खासदारांच्या कामांच्या यादीत अधिकाधिक खर्च वरील कामांवर करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुका अवघ्या एका वर्षांवर येऊन ठेपल्या असताना पुढील निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून नुकतीच खासदार निधीतील चार वर्षांमधील कामाची यादी जाहीर करण्यात आली आहे. खासदारांनी चार वर्षांत खर्च केलेल्या निधीचा, कामांचा आणि त्याचा सद्य:स्थितीची परिस्थिती या यादीमध्ये दिसून येत आहे.
दरवर्षी खासदारांना विकास कामांसाठी ५ कोटी एवढा निधी केंद्र शासनाकडून उपलब्ध होतो. गेल्या चार वर्षांत मिळालेल्या २० कोटी रुपयांमध्ये भरीव कामे करण्यापेक्षा गल्लीतील गटारे, पायवाटा, रस्ते, मलवाहिन्या, व्यायामशाळा, समाजमंदिर, ज्येष्ठ नागरिक कट्टे, उद्यानाचे सुशोभीकरण, आसन व्यवस्था अशाच कामांवर ठाणे जिल्ह्य़ातील तिन्ही खासदारांनी भर दिल्याचे दिसून येते. ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर ही शहरे वेगाने विकसित होत असताना या शहरांमध्ये नियोजनाचे मोठे प्रश्न भेडसावू लागले आहेत. शिक्षण, आरोग्य, दळणवळण, शहर विकास, पर्यावरण, महामार्ग, उद्योगधंदे, रोजगार, जलवाहतूक यासंबंधी महत्त्वाची धोरणे आखण्यासंबंधी खासदारांनी सातत्याने पाठपुरावा करणे अपेक्षित असते. असा पाठपुरावा काही खासदारांकडून होत असला तरी निधी वापरताना मात्र ही मंडळी गल्लीतल्या कामांमध्येच रमतात हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ठाणे आणि कल्याण या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत रेल्वे स्थानकांचे मोठे जाळे पसरले आहे. खासदार निधीतून रेल्वे परिसरातील विकास कामे करण्याचा आग्रह सातत्याने धरला जात असला तरी या कामांच्या मंजुरीबाबत अडथळे उभे राहात असल्याचे मत खासदारांकडून मांडले जात असते. त्यामुळे ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील खासदारांनी रेल्वे परिसरातील कामांना प्राधान्य देण्याऐवजी गटर, पायवाटा, उद्यान उभारणीसारख्या कामांमध्येच लक्ष दिले असल्याचे स्पष्ट होत आहे. काही माजी खासदारांनी पाच वर्षांचा खासदार निधी एकत्र करून एकच भरीव काम करण्याकडे भर दिल्याची उदाहरणे आहेत. ठाणे जिल्ह्य़ातील खासदारांचा मात्र भरीव कामांमध्ये नगरसेवकांकडून अपेक्षित असलेलीच कामे करण्याकडे कल असल्याचे दिसून येते.
मी चार वर्षांत तलाव, उद्यान संवर्धन यांसारख्या कामांवर भर दिला. महापालिकेच्या माध्यमातून होणारी स्थापत्य कामे मी सुचवलेली नाहीत. याशिवाय रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांविषयी केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. कोपरी पुलाचे रुंदीकरण, दिघा रेल्वे स्थानकाची बांधणी, ऐरोली-कळवा रेल्वे मार्ग, जलवाहतूक प्रकल्प यासाठी शिवसेनेच्या खासदारांनी केलेले प्रयत्न मतदारांना अवगत आहेत.
– राजन विचारे, खासदार, ठाणे