ठाणे –  मुंबई, ठाणे आणि उपनगरांतून  दिवाळीकरीता  पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा या भागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. याच पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागातर्फे दिवाळीकरिता अधिकच्या बस सोडण्यात येणार आहेत. येत्या १५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीत ठाणे एसटीच्या विविध आगारांमधून प्रतिदिन ३० जास्त बस धावणार आहेत. या गाड्यांसाठीची आरक्षण प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती ठाणे एसटी विभागाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा >>> कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉक्टरला मारहाण करण्याचा प्रयत्न

गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या नागरिकांची तर नवरात्री दरम्यान कोल्हापूर, सोलापूर तसेच नाशिक याठिकाणी असलेल्या देवींच्या मंदिरात जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. या नागरिकांच्या सोयीसाठी राज्य एसटी विभागाकडून दरवर्षी अधिकच्या बस सोडण्यात येतात. यावर्षी देखील गणेशोत्सवादरम्यान ठाणे एसटी विभागाकडून कोकणात जाण्यासाठी अधिकच्या गाड्या सोडण्यात आल्या होत्या. या अधिकच्या वाहतुकीतून ठाणे एसटी विभागाला दोन कोटी रुपयांहून अधिकचे उत्पन्न मिळाले होते. नवरात्री नंतर येणाऱ्या दिवाळी उत्सवात मुंबई, ठाणे आणि उपनगरांतून  अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, पुणे, उस्मानाबाद, कोल्हापूर, पाचोरा, कराड, शिरूर, जळगाव या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असते. याच पार्श्वभूमीवर ठाणे एसटी विभागातर्फे यासर्व भागांमध्ये जाण्यासाठी अधिकच्या गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील विविध बस आगारांतून या भागांमध्ये दररोज अधिकची वाहतूक करण्यात येणार आहे.  येत्या १५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या दरम्यान ही  वाहतूक होणार आहे. प्रवाशांना जवळच्या बस स्थानकावरून तसेच एमएसआरटीसीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवरून  या गाड्यांसाठीचे आरक्षण करता येणार असल्याची माहिती ठाणे एसटी विभागाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा >>> कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉक्टरला मारहाण करण्याचा प्रयत्न

हेही वाचा >>> बेकायदा बांधकामांची पाठराखण करणाऱ्या कडोंमपा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा ; मनसे आमदार प्रमोद पाटील यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

* ठाणे १ आगारातून पाचोरा, शिरूर, साकोरी, मंचर, महाबळेश्वर, सांगोला, वडूज, गलमेवाडी या ठिकाणी दररोज आठ गाड्या

* ठाणे २ आगारातून महाबळेश्वर अकोला, चाफळ, जत, विटा, धनेगाव या ठिकाणी दररोज सहा गाड्या

* भिवंडी आगारातून जुन्नर, कळंब आणि संगमनेर या ठिकाणी दररोज तीन गाड्या

* शहापूर आगारातून धुळे, चोपडा, नाशिक, मालेगाव, अंमळनेर या ठिकाणी दररोज चार गाड्या

* कल्याण आगारातून धुळे, मालेगाव, औरंगाबाद, अकोला, चिखली, जालना, खामगाव या ठिकाणी दररोज तीन गाड्या

* मुरबाड येथून साकोरी आणि घोडेगाव येथे दररोज दोन गाड्या * विठ्ठलवाडी आगारातून इस्लामपूर, शिरूर, सातारा या ठिकाणी दररोज चार गाड्या