Mumbra Kalwa Vidhan Sabha Election 2024 : ठाणे महागनरपालिका क्षेत्रात असलेला परंतु ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडत नसलेला मतदारसंघ म्हणजे कळवा-मुंब्रा मतदारसंघ. २००९ पूर्वी हा मतदारसंघ बेलापूर मतदारसंघात मोडत होता. तेव्हा गणेश नाईक यांनी बरीच वर्षेत इथे नेतृत्व केलं. परंतु, २००९ ला मतदारसंघांची पुनर्रचना झाल्याने कळवा मुंब्रा मतदारसंघ निर्माण झाला आणि तेव्हापासून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्याकडे हा मतदारसंघ आहे. परंतु. आता राष्ट्रवादीतील फुटीमुळे ही जागा कोणाला मिळतेय हे पाहावं लागेल.

संपूर्ण कळवा पश्चिम, रेतीबंदर, पारसिक नगर, खारीगाव, पूर्वेकडील विटावा, सूर्या नगर, मुंब्रा, कौसा हे सर्व भाग या मतदार संघात येतात. भूमिपूत्र आगरी-कोळी बांधव आणि मुस्लीम समाज असा मिश्र मतदार येथे राहतात. कळवा मुंब्रा हा मतदारसंघ राष्ट्रवाडीचा गड राहिला आहे. गेल्या पंधरा वर्षात जितेंद्र आव्हाडांनी येथे खूप कामं केली आहेत. म्हणून मोदी लाटेतही राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड निवडून आले. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली तर जितेंद्र आव्हाडांनाच पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा >> Ovala Majiwada Sabha Constituency : उच्चभ्रू वस्तीच्या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार?

नजीब मुल्लांनी केलं होतं सूचक विधान

तर महायुतीमध्ये ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेवरून मुस्लीम उमेदवार उभा करून अजित पवार गटाकडून कळवा मुंब्रा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतील अशी चर्चा आहे. त्यामुळे या मतदारसंघातून नजिब मुल्ला यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. “गेल्या पंधरा वर्षांपासून मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली जात आहे. तसेच घड्याळ चिन्हावरच येथे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे आता विधासभा निवडणुकीत मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवली जाणार आहे. आज आम्ही यासंदर्भात स्पष्ट करत आहोत की, पक्ष जो उमेदवार देईन त्या उमेदवाराला आम्ही निवडून आणणार आहोत”, असं नजिब मुल्ला काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. त्यामुळे महायुतीकडून नजीब मुल्ला यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

तसंच एआयएमआयएम या पक्षानेही येथून उमेदवार उभा केल्यास कडवी झुंज होऊ शकते. त्यामुळे या मतदारसंघात थेट राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार असला तरीही इतर पक्षांचंही आव्हान असणार आहे. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड १ लाख ९ हजार २८३ मतानी जिंकले होते. तर, शिसेनेच्या दिपाली सय्यद ३३ हजार ६४४ मतांनी आणि आम आदमी पक्षाचे अबू फैजी यांना ३०हजार ५२० मते मिळाली आहे.