ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बुधवारी कोपरी भागाचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान सार्वजनिक शौचालयामध्ये अस्वच्छता तसेच नळांना गळती लागून पाणी वाया जाणे आणि देखभाल करण्यासाठी कोणीच हजर नसणे, अशी बाबी निदर्शनास आल्या आहेत. या मुद्द्यावरून बांगर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ‘त्या’ दोन शौचालयांच्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शौचालयांची स्वच्छता आणि कचरा साठू न देणे यावर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

हेही वाचा- भिवंडी महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, ११ हजारांचे सानुग्रह अनुदान जाहीर

ठाणे महापालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विविध विभागांचा आढावा बांगर यांनी घेतला. त्यानंतर, बुधवारी कोपरी ते आनंदनगर परिसरात प्रथमच त्यांनी दौरा केला. त्यांनी चेंदणी काेळीवाडा, हरियाली तलाव, अष्टविनायक चौक या परिसराची पायी फिरून पाहणी केली. त्याचदरम्यान कोळी वाडा वस्ती स्वच्छतागृहातील पाण्याची गळती, शौचकूप आणि व्हरांड्यातील अस्वच्छता, तसेच देखभाल करण्यासाठी कोणीच हजर नसणे, अशी बाब त्यांच्या निदर्शनास आली. याबाबत आयुक्त बांगर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हाच प्रकार, कोपरी-मीठबंदर विसर्जन घाटापाशी असलेल्या स्वच्छतागृहातही होता. या दोन्ही स्वच्छतागृहांच्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले. आपल्या शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयांची कोणतीही समस्या असेल तर ती प्राधान्याने दूर करावी. नागरिकांची गैरसोय अजिबात खपवून घेतली जाणार नाही, अशी ताकीद आयुक्तांनी दिली.

हेही वाचा- विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

कोपरी-मिठबंदर विसर्जन घाट, सॅटीस पुलाचे काम, कचऱ्यातून सापडलेल्या वेगवेगळ्या वस्तूंचे संग्रहालय, कोपरी स्मशानभूमी, राम मराठे उद्यान, सिध्दार्थ नगर परिसर, कपडा मार्केट, ठाणे पूर्व स्टेशन परिसर, आनंदनगर प्रवेशद्वार, सेवा रस्ता, तीन हात नाका ते नितीन कंपनी येथेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाहणी केली. प्रत्येक ठिकाणी तेथील स्थानिक प्रकल्प, स्वच्छता, रस्त्याचा कडेला असलेला कचरा याबद्दल त्यांनी नौपाडा परिमंडळाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी सूचना केल्या.

हेही वाचा- डोंबिवलीत बालभवनमध्ये अभिजित चौबळ यांच्या लाकडी भित्ती चित्रांचे प्रदर्शन ; १५, १६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शन

शौचालय स्वच्छता हा सर्व नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे किंवा अमलबजावणीतील चूकांमुळे शौचालय अस्वच्छ असतील, तर नागरिकांना मोठ्या असुविधेचा सामना करावा लागतो. सदर बाब स्वीकाहार्ह नसून याबाबत कारवाई करण्याची वेळ न पाहता तत्परतेने दुरुस्ती होईल, याची दक्षता घ्यावी, असे आदेश ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.