विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पावसाळ्यानंतर दिल्लीत मेळावा होणार
बदलापूरः लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याचा मुद्दा प्रथमच राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला आहे. अखिल भारतीय लवणकार (आगरी) समाजाच्या नवी दिल्लीत सोमवारी झालेल्या बैठकीत दि. बा. पाटील यांचे विमानतळाला नाव देण्याबरोबरच समाजाच्या विविध मागण्यांसाठी रामलीला मैदानावर पावसाळ्यानंतर दोन लाख समाजबांधवांचा मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या मेळाव्यामुळे प्रथमच नवी मुंबईनंतर विमानतळ नामकरणाचा प्रश्न थेट दिल्लीत पोहोचणार आहे. या मेळाव्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनाही आमंत्रित केले जाणार आहे.
मिठागरांमध्ये मीठ जमा करण्याचे कार्य ज्यांचे पूर्वज करीत होते, त्या देशभरातील २२ राज्यांतील लवणकार अर्थात आगरी समाजातील निवडक प्रतिनिधींचे संमेलन नवी दिल्ली येथील राजा राममोहन मेमोरियल हॉलमध्ये सोमवारी सायंकाळी पार पडले. या संमेलनाचे उद्घाटन जगद्गुरू श्री श्री श्री पुरुषोत्तमानंद पुरी महास्वामीजी यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांची उपस्थिती होती. प्राचीन लवणकार आणि व्यापारी जाती संघाच्यावतीने संयोजक कृष्ण कुमार भारती यांनी संमेलनाचे आयोजन केले होते. यावेळी नियोजित नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याचा लवणकार समाजाकडून आग्रह धरण्यात येणार आहे. नवी मुंबईसह ठाणे व रायगड जिल्ह्यात दिबांचे नाव देण्यासाठी स्थानिक आगरी समाजाने केलेल्या आंदोलनाची माहिती दशरथ पाटील यांनी बैठकीत दिली.
त्यानंतर इतर राज्यातील लवणकार प्रतिनिधींनीही विमानतळाला नाव देण्याच्या मागणीला पाठिंबा दिला. पावसाळ्यानंतर रामलीला मैदानात देशभरातील दोन लाखांहून अधिक समाजबांधवांचा मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या मेळाव्यामुळे दि.बा. पाटील यांचे नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याचा प्रश्न थेट राष्ट्रीय पातळीवर जाणार आहे. केंद्रीय मंत्री पंचायत राज राज्यमंत्री कपील पाटील यांनी रामलीला मैदानात होणाऱ्या मेळाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह यांना उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी २२ राज्यातील निवडक प्रतिनिधींबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली जाईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेला राज्यात कोंडीत पकडण्यासाठी आता दिल्लीत आंदोलन केले जाणार आहे.