ठाणे : मुंब्रा येथील कौसा ते शीळ भागात दोनशे अनधिकृत बांधकामे उभारणीची कामे सुरू आहेत. एक-एका इमारतीमध्ये ४०-४० लाख रुपये वाटले जात आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. एका लेडी डॉनने ठाणे महापालिका प्रशासनाला तसेच पोलीस प्रशासनाला हाताशी धरुन ब्लॅकमेलींगचा मोठा व्यवसाय सुरु केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच धोकादायक इमारतीमधील कोणा-कोणाला म्हाडामध्ये घरे देण्यात आली, याची माहिती पालिकेकडे उपलब्ध नसून हे प्रकरण मिटविण्यासाठी मुंब्र्यातील जावेद नावाच्या एका व्यक्तीला ५० लाख रुपये देण्यात आले, असा दावाही त्यांनी केला आहे. यानिमित्ताने ती लेडी डाॅन आणि तो जावेद कोण अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.
सध्या मुंब्रा ते शीळ या भागामध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. एक-एका इमारतीमागे ४०-४० लाख रुपये वाटले जात आहेत. एका लेडी डॉनने ठाणे महापालिका प्रशासनाला तसेच पोलीस प्रशासनाला हाताशी धरुन ब्लॅकमेलींगचा मोठा व्यवसाय सुरु केला आहे. कुठल्याही इमारतीचे बांधकाम चालू असेल तर त्याठिकाणी बुलडोझर, पोकलेन घेऊन जायचे. तोडण्याचे नाटक सुरु करायचे आणि नंतर १५-२० लाख रुपये घेऊन सेटलमेंट करायची. यामध्ये सगळ्यांचेच हफ्ते बांधलेले आहेत, असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला आहे. ज्या इमारती धोकादायक होत्या, त्याच्यातील एक इमारत शिबली नगरमध्ये निष्कासित करण्यात आली होती. त्या सगळ्यांना म्हाडामध्ये घरे देण्यात आली. परंतु आता त्याच इमारतीचे पुर्नबांधकाम अनधिकृतरीत्या सुरु करण्यात आले आहे. एकतर म्हाडामध्ये कोणाला घरे दिली, कशी दिली याचे कुठलेही परिक्षण ठाणे महापालिकेने आजपर्यंत केलेले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. जी केस म्हाडा संबंधी झाली होती आणि ज्यामध्ये वीर नावाच्या अधिकाऱ्याचे जबाब होता. ज्याच्यावर ही सगळी केस अवलंबून होती, त्या वीर चे जे म्हणणे होते की, जे त्याच्याकडून लिहून घेतले होते, ती कागदपत्रेच गहाळ आहेत. हे मिटविण्यासाठी मुंब्र्यातील एका जावेद नावाच्या व्यक्तीला ५० लाख रुपये देण्यात आले आणि त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांना किती पैसे देण्यात आले याची जावेदला व्यवस्थित माहिती आहे. त्या पैशांमुळेच म्हाडाची केस दाबण्यात आली. म्हाडामध्ये कोणा-कोणाला घरे दिली याची माहिती पालिकेला नाही, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. म्हाडामध्ये घरे उपलब्ध करुन दिली असतील तर पुन्हा इमारत बांधलीच कशी जाऊ शकते. आणि त्याच्यावर ठाणे महापालिकेचा काहीच अंकुश नाही का? हा प्रश्न उभा राहतोच. आता दिवा परिसरासाठी नवीन अधिकारी देण्यात आले आहेत असे समजते. तर ही तक्रार दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना पाठवून कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
कृपा झाल्यामुळेच हे सगळं प्रकरण मिटविण्यात आलं
तक्रार करुन काहीच होणार नाही हे माहित असून मी तक्रार करीत आहे. कारण, आता परत कौसा ते शीळ येथे जवळ-जवळ दोनशे अनधिकृत बांधकामे चालू आहेत. ठाणे महापालिका आयुक्त आपण याकडे कधी लक्ष देणार. आपण यावर कधी कारवाई करणार. ज्या जावेदला ५० लाख रुपये देण्यात आले, त्या जावेदचे नाव मी उघड करीत आहे. हिम्मत असेल तर त्या जावेदला बोलावून विचारा. पण, पोलीस त्याला बोलावणार नाहीत. कारण, पोलीसांनी जे काही केले आहे, ते संपूर्ण मुंब्र्याला माहित आहे. यामध्ये कृपा कोणाची झाली आहे, हे देखिल सगळ्यांना माहित आहे. कृपा झाल्यामुळेच हे सगळं प्रकरण मिटविण्यात आलं. हे काही वेळ शांत राहू शकेलं पण, कायमच कधीच शांत होणार नाही. कारण, कागदपत्रे बदलता येणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा >>>कल्याण-डोंबिवलीत रस्त्यांवरील उंचवटे गतिरोधक जीवघेणे ; दुचाकी, रिक्षा उलट्या होण्याचे प्रमाण
ठाणे महापालिकेवर कायद्याचे राज्य आहे का ?
ज्या योजनेअंतर्गत अधिकृत इमारतीमध्ये ठाणे महापालिकेला घरे देण्यात येतात, ती घरे कोणाला देण्यात आली आणि कशी देण्यात आली. त्या संबंधी तक्रार करुनही ठाणे महापालिकेने हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. ठाणे महापालिकेची लूट ही गुन्हेगारी माध्यमातून करण्यात येत आहे. गुन्हेगार दुर्देवाने ठाणे महापालिकेमध्ये बसलेले आहेत. काही भाग्यवान असे आहेत की, त्यांना मुंब्र्यातील म्हाडामध्ये एक-एक मजला देण्यात आला आहे. तसेच लोढामध्ये जी काही दुकाने होती, ती देखिल आपल्याच नातेवाईकांना देण्याचा घाट ठाणे महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घातला आणि तो यशस्वी देखिल करुन दाखवला. ठाणे महापालिकेवर कायद्याचे राज्य आहे की, नाही हेच कळत नाही, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.