ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा क्षेत्रांत मिळालेल्या मताधिक्याने शिवसेना शिंदे गटाचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यापैकी ठाणे शहरातील दोन मतदारसंघांत शिवसेनेचाच आमदार असताना आता भाजपचा आमदार असलेला विधानसभा मतदारसंघही आपल्याकडे यावा, यासाठी शिंदे गटाने चाचपणी सुरू केली आहे. यामागे ठाणे जिल्ह्यातील वर्चस्वाची स्पर्धा हे एक कारण असले तरी, आरोपांच्या फैरींनी शिंदे गटाला नेहमीच जेरीस आणणारे ठाण्याचे भाजप आमदार संजय केळकर यांना अडथळा निर्माण करणे, हादेखील हेतू असल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांना ठाणे विधानसभा क्षेत्रातून ४८ हजार मतांची भरभक्कम आघाडी मिळाली. त्यानंतर आता शिंदे गटाने नौपाडा, पाचपाखाडी, टेंभीनाका, सिद्धेश्वर तलाव, ढोकाळी, मानपाड्यापासून घोडबंदरच्या टोकापर्यंत प्रभागनिहाय कामगिरीचा आणि स्वपक्षाच्या ताकदीचा नव्याने आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. ठाणे विधानसभा क्षेत्रात भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नौपाड्यातून म्हस्के यांना १८ हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले. पाचपाखाडी, टेकडी बंगला, चंदनवाडी, सिद्धेश्वर तलाव हा परिसर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांचा एकेकाळचा बालेकिल्ला मानला जातो. येथेही म्हस्के यांनी सहा हजारांचे मताधिक्य मिळविले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे देवराम आणि संजय भोईर या पिता-पुत्राच्या ढोकाळी, मानपाडा प्रभागांमध्ये म्हस्के यांनी मोठी आघाडी घेतली. टेंभी नाक्यावर महायुतीला अपेक्षित आघाडी मिळाली. या विजयाचे वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण करण्यास शिंदेसेनेने सुरुवात केली असून हे मताधिक्य केवळ भाजपमुळे मिळालेले नाही असा दावा या पक्षाचे नेते खासगीत करू लागले आहेत. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

हेही वाचा >>>ठाण्यातील श्वानावरील अत्याचारप्रकरणी अखेर गुन्हा दाखल;जुन्या कलमानुसार ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला

शिंदे गटाच्या या हालचालींमागे ठाण्याचे भाजपचे आमदार संजय केळकर लक्ष्य असल्याचे बोलले जात आहे. दहा वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत केळकर यांनी ठाणे विधानसभा मतदारसंघात तेव्हाच्या एकसंघ शिवसेनेला पराभवाचा धक्का दिला होता. हा पराभव शिंदे यांच्यासाठी आजही दुखरी नस मानली जाते. त्यामुळेच पाच वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत युती असतानाही शिंदेसमर्थक एका गटाने मनसेला छुपी मदत केल्याची चर्चा रंगली होती. मनसेचे अविनाश जाधव यांना मिळालेल्या ७० हजार मतांमध्ये केळकरविरोधी शिवसेनेतील मतांचाही समावेश असल्याचे बोलले जात होते. दहा वर्षांच्या कार्यकाळात केळकर यांनी अनेकदा ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात उघडपणे भूमिका घेतली आहे. त्याचा रोख अनेकदा ठाणे महापालिकेवर एकहाती अंमल असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिला आहे. गेल्या अडीच वर्षांत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही केळकर यांनी ठाणे महापालिकेतील गैरकारभार, बेकायदा बांधकामे, दर्जाहीन कामे आदी मुद्द्यांवरून शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष हल्लाबोल केल्याचे अनेकदा दिसून आले. त्यामुळे शिंदे गटाने केळकर यांच्याविरोधात आघाडीच उघडल्याचे बोलले जात आहे. जागावाटपाची चर्चा करताना या मतदारसंघातील प्रभागनिहाय मताधिक्याची गणिते नव्याने तपासली जातीलच, अशी प्रतिक्रिया शिंदेसेनेतील एका नेत्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्यावर नेहमीच आरोपांच्या फैरी झाडणारे आमदार संजय केळकर यांच्या उमेदवारीत शिंदे गटाचा अडथळा मोठा ठरण्याची शक्यता आहे.

कुणाला उमेदवारी मिळणार, कुणाचे तिकीट कापले जाणार, कोण डावलले जाणार, कोण मुसंडी मारणार… विधानसभा निवडणुकीच्या आधी मतदारसंघांमध्ये सुरू असलेल्या राजकारणाचा आणि त्यामागील कारणांचा ठाव घेणारे हे वृत्तसदर…

ठाणे लोकसभा मतदारसंघातील विजय हा महायुतीचा होता. तो काही कोणत्या एका पक्षाचा नव्हता. या मतदारसंघातील भाजप नगरसेवक असलेल्या पॅनलमधील मताधिक्याचे आकडे आमच्याकडेही आहेत. त्यामुळे ठाणे विधानसभा मतदारसंघावर कुणी दावा करत असेल तर तो हास्यास्पद आहे. दोन्ही पक्षांचे नेते समंजस आहेत. सलग दहा वर्षे ठाण्यातून भाजपचा आमदार निवडून येत असताना जागावाटपाच्या चर्चेत काही आगळीक होईल असे वाटत नाही. – संजय वाघुले, शहराध्यक्ष भाजप