लोकसत्ता प्रतिनिधी

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या किनारी सुरू असलेल्या शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पात घाट निर्मितीच्या कामाच्या ठिकाणी एक जुने भव्य पिंपळाचे वृक्ष उन्मळून पडल्याचे समोर आले. येथे सुरू असलेल्या कामामुळे हे वृक्ष उन्मळून पडल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. तर याप्रकरणी हिराली फाऊंडेशनच्या सरिता खानचंदानी यांच्या तक्रारीवर संबंधित कंत्राटदाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे झाड पन्नास वर्षांपेक्षा अधिक जुने असल्याचे येथील जुने जाणते रहिवासी सांगतात.

अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या अस्तित्वावरून गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा सुरू असतानाच दोनच दिवसांपूर्वी वालधुनी नदीच्या किनारी असलेल्या शिवमंदिराजवळ एक जुने पिंपळाचे वृक्ष उन्मळून पडले. हे वृक्ष पन्नास वर्षांपेक्षा अधिक असल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात. या झाड्याची पुजाही केली जात होती. हे वृक्ष इतके भव्य होते की ते उन्मळून पडल्यानंतर वालधुनी नदीच्या पात्राच्या एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंचा भाग व्यापला होता. वृक्ष उन्मळून पडल्याचे छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारीत झाल्यानंतर अंबरनाथ शहरातील जुने जाणत्यांकडून हळहळ व्यक्त होत होती.

आणखी वाचा-येऊरमध्ये तोंडदेखली कारवाई, पर्यावरणवादी संघटनांचा आरोप; सात बेकायदा ढाबे, हॉटेल जमीनदोस्त

अंबरनाथच्या या नदीकिनारी शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामात सध्या वालधुनी नदी किनारी घाटाची निर्मिती केली जाते आहे. त्यासाठी येथील मोठा भाग सपाट करण्यात आला आहे. मात्र येथे सुरू असलेल्या कामात वृक्षाची मुळे उखडली गेल्याचा आरोप करत हिराली फाऊंडेशनच्या सरिता खानचंदांनी यांनी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबतची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून नगरपालिकेमार्फत सुशोभीकरण करणाऱ्या कंत्राटदाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ कलम ८ आणि २१ (१) अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे.