ठाणे – भिवंडी येथील शांतीनगर पाईपलाईनजवळील परिसरात शनिवारी आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून मोबाईल चोरीच्या संशयावरुन त्याची हत्या झाल्याची बाब शांतीनगर पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

हेही वाचा – शिदेंच्या उमेदवाराचे विजयासाठी स्वपक्षियांसमोर लोटांगण, आमदार बालाजी किणीकर यांची शिवसैनिकांसमोर दिलगिरी

हेही वाचा – ठाणे : दिवाळीनिमित्त बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, खरेदीमुळे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी

भिवंडी येथील शांतीनगर पाईपलाईनजवळील परिसरात शनिवारी एका तरुणाचा बेवासर मृतदेह आढळला होता. त्याची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून त्याचे नाव मोहम्मद रहमत शहा आलम (२०) आहे. तो मूळचा कोलकत्ता येथील रहिवाशी आहे. सहा महिन्यांपूर्वी तो कामानिमित्त भिवंडीत आला होता. भिवंडीतील सहयोगनगर येथे राहणाऱ्या मोहम्मद अरमानच्या एका साथीदाराचा मोबाईल चोरीला गेला होता. त्यावेळी त्यांनी मोहम्मद रहमत शहा आलम याची झडती घेतली. यावेळी आलम याच्याकडे चार ते पाच मोबाईल सापडले होते. त्यामध्ये आरमानच्या साथीदारांच्या मोबाईलचा समावेश होता. त्यामुळे मोबाईल चोरीच्या संशयावरुन अरमान आणि त्याच्या साथीदारांनी बुधवारी गोविंदनगर येथील पाईपलाईन रोड परिसरात मोहम्मद रहमत शहा आलम याला लाकडी दांडक्याने आणि हाताने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला, अशी बाब पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण ७ आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके उत्तर प्रदेश आणि बिहार येथे गेली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.