ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांची समजूत काढून देखील ते सातत्याने बारामती लोकसभेमध्ये महायुतीचे वातावरण गढूळ करत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे त्यांच्या नेत्यांवर नियंत्रण राहिले नसल्याचे चित्र निर्माण होत आहे. बारामतीमध्ये शिवतारे हे महायुतीचा धर्म तोडत असतील तर, ज्या लोकसभेच्या जागांवर शिवसेनेचा (शिंदे गट) उमेदवार लढणार आहे. तिथे राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील महायुतीचा धर्म तोडू शकतात असा इशारा राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विजय शिवतारे यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना समज दिल्यानंतरही त्यांच्याकडून वारंवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात आगपाखड सुरु आहे. आम्हाला महायुतीचे वातावरण गढूळ होईल असे कृत्य करायचे नाही. शिवतारे यांच्या कृत्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेत्यांवर नियंत्रण नाही असे चित्र निर्माण होत आहे. बारामतीमध्ये शिवतारे हे महायुतीचा धर्म तोडत असतील तर, ज्या लोकसभेच्या जागांवर शिवसेनेचा (शिंदे गट) उमेदवार लढणार आहे. तिथे आमचे पदाधिकारी देखील महायुतीचा धर्म तोडू शकतात असे परांजपे म्हणाले.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांचे ‘धनुष्य’ गणेश नाईकांच्या खांद्यावर? ठाण्याच्या जागेसाठी मनोमिलन?

हेही वाचा – मुरबाडमधील कपील पाटील यांच्या बैठकीकडे किसन कथोरे समर्थकांची पाठ

हेही वाचा – जादा परताव्याच्या आमिषाने गुतंवणूकदारांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक, सॅमसन युनिट्रेड कंपनीचा संचालक अटकेत

शिवतारे हे महायुतीच्या दुधात मीठाचा खडा टाकत आहेत, परंतु पुरंदरच्या जनतेने त्यांना त्यांची जागा २०१९ मध्ये दाखविली असेही पंराजपे म्हणाले. कल्याणमधील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवून येथील लोकसभा कमळ चिन्हावर लढविली जावी अशी मागणी केली आहे. प्रत्येक मतदारसंघात उमेदवाराने आपल्या पक्षाचे चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी अशी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भावना असणे स्वाभाविक आहे. कल्याण मतदारसंघांमध्ये भाजपचे तीन आमदार आहेत, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भावना वरिष्ठांकडे मांडली आहे. यामध्ये गैर नसल्याचेही त्यांनी सांगितले.