Pratap Sarnaik in Ovala Majiwada Vidhan Sabha Constituency : २००९ च्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत काही मतदारसंघांचं विभाजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये ठाण्यातील काही मतदारसंघांचही विभाजन झालं. हे विभाजन होऊन ओवळा माजिवडा हा मतदारसंघ निर्माण झाला. हा मतदारसंघ केवळ ठाणे महानगरपालिकेपुरता मर्यादित नसून मीरा भाईंदर महानगरपालिकेतील काही समित्यांचाही यात समावेश आहे. २००९ सालापासून या मतदारसंघातून शिवसेनेचे प्रताप सरनाईक जिंकून येत आहेत. यंदाही महायुतीतून त्यांनाच तिकिट मिळण्याची शक्यता आहे.

उच्चभ्रू लोकांचा मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे. कारण, गेल्या काही वर्षांत या विभागात झालेल्या विकासकामांमुळे ठाण्यातील सर्वांत मोठ्या वसाहती आणि सोसायट्या याच मतदारसंघात येतात. २००९ सालापासून आमदार प्रताप सरनाईक यांनी ओवळा माजिवडा मतदारसंघ आपल्या काबूत ठेवला आहे. २०१४ मध्ये शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे सर्व पक्ष स्वबळावर लढले होते. त्यामुळे येथील लढत चुरचीशी ठरली होती. या चुरशीच्या लढाईतही प्रताप सरनाईक यांनी बाजी मारली होती. प्रताप सरनाईक यांनी २०१४ ला भाजपाच्या संजय पांडे यांचा १० हजारांच्या फरकाने पराभव केला होता. २०१९ मध्ये युतीचे उमेदवार म्हणून प्रताप सरनाईक यांना उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी काँग्रेसचे विक्रांत भीमसेन त्यांच्याविरोधात होते. तेव्हाही प्रताप सरनाईक यांनी ८४ हजार मतांच्या फरकाने ही निवडणूक जिंकली होती.

हेही वाचा >> Mira Bhayandar Vidhan Sabha Constituency 2024 : अपक्ष आमदाराच्या मतदारसंघात कडवी झुंज; भाजपा मारणार बाजी की महाविकास आघाडीला मिळणार संधी?

यावेळी परिस्थिती त्याहूनही वेगळी आहे. दोन पक्षांतील फूटीमुळे महायुतीतून प्रताप सरनाईक यांना संधी मिळाली तरी महाविकास आघाडीत ही जागा कोणत्या पक्षाकडे जातेय हे पाहावं लागेल. सध्या तरी राजकीय चर्चांनुसार ही जागा ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथेही शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात कोणत्या समस्या?

ठाण्यातील लोकमान्यनगर, वर्तकनगर, शास्त्रीनगर, शिवाजीनगर अशा बैठ्या चाळीच्या मध्यम आणि गरीब वर्गाची लोकवस्तीही या मतदारसंघात आहे. तर वाघबीळ, कासारवडवली, माजिवडा, गायमुखपर्यंतचा भागही याच मतदारसंघांमध्ये येतो. तर दुसरीकडे मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विभागातल्या चेन्ना गाव, घोडबंदर गाव, वर्सोवा, काशिमिरा, गोल्डन नेक्स्ट, नवघर हे विभाग देखील ओवळा माजिवडा याच मतदारसंघात मोडतात. एका बाजूला टोलेजंग इमारती, तर दुसऱ्या बाजूला वर्षानुवर्षे विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या बैठ्या चाळी येथे आहेत. तर, घोडबंदर रोड, भिवंडी बायपास, मुंबई नाशिक महामार्ग हेही याच मतदारसंघातून जातात. या रस्त्यांची दूरवस्था झाल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. दिवसेंदिवस येथील लोकवस्ती वाढत असल्याने वाहतूक कोंडीचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे. तर, दुसरीकडे टोलेजंग इमारती असल्या तरीही येथे काही भागात पाण्याची मोठी समस्या आजही भेडसावते आहे. या सर्व बाबींवर यंदाचं मतदान होण्याची शक्यता आहे.