विधानसभा, पालिका निवडणुकांसाठी पक्षबांधणी बदलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्ह्य़ातील नेते गणेश नाईक यांचा भाजपप्रवेश नक्की असल्याने सावध झालेल्या पक्षश्रेष्ठींनी आता जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या शहरांमधील संघटनेची नव्याने बांधणी सुरू केली आहे. आगामी विधानसभा आणि पालिका निवडणुकीसाठी पक्षबांधणी व्हावी यासाठी बदलापूर पक्षाने खांदेपालट सुरू केला असून नगरसेवक असलेल्या आशीष दामलेंकडे शहराध्यक्षपदाचा, तर विद्यमान शहराध्यक्ष कालिदास देशमुख यांना पक्षाच्या चिटणीसपदाचा कारभार सोपवण्यात आला आहे. बदलापूर शहर आणि आसपासच्या भागांत पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदवान होता. मुरबाडचे विद्यमान आमदार किसन कथोरे हे राष्ट्रवादीतून आमदार होते, तर भाजप आणि शिवसेनेत असलेले अनेक मातब्बर नगरसेवक त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. पाच वर्षांपूर्वी मोदीलाटेत यापैकी काहींनी भाजप आणि शिवसेनेत उडय़ा घेतल्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उतरती कळा लागली. एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या कुळगाव- बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीतही पक्षांतर्गत गटबाजीमुळे अवघे दोन नगरसेवक निवडून आले. शहरात नगरसेवक आशीष दामले यांचा एक गट, तर कालिदास देशमुख यांचा शहराध्यक्षाचा गट असे दोन गट दिसत होते. पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीतही ही गटबाजी दिसून आली. सध्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी भाजपचा मार्ग निवडल्याने स्थानिक नेतृत्व यावर काय भूमिका घेते याबाबत प्रश्न होते. मात्र त्यापूर्वीच पक्षश्रेष्ठींनी बदलापूर शहरात खांदेपालट केले आहे. नगरसेवक आशीष दामले यांना बदलापूर शहर अध्यक्षाची धुरा सोपवण्यात आली आहे, तर सध्याचे शहराध्यक्ष कालिदास देशमुख यांची प्रदेश चिटणीस म्हणून नेमणूक केली आहे. त्यामुळे शहरातील दोन गटांतील संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पक्षाने माझ्या आंदोलनाची दखल घेत मला प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी दिल्याची प्रतिक्रिया कालिदास देशमुख यांनी दिली आहे, तर पालिका आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाची भरारी दाखवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आशीष दामले यांनी सांगितले आहे.