पाण्याची तीव्र टंचाई असल्याने जिल्हा परिषदेच्या पिसवली शाळेतील सुमारे सातशे विद्यार्थ्यांनी पाणीमुक्त धुलिवंदन खेळण्याचा संकल्प सोडला आहे. विद्यार्थ्यांनी पाण्याचा अजिबात वापर करू नये तसेच गुलाल आणि इतर कोरडय़ा रंगांचा वापर करावा. याशिवाय नैसर्गिक फळांचा रस काढून त्याद्वारे शक्यतो धुलिवंदन साजरे करावे. घरातील, सार्वजनिक ठिकाणच्या पाण्याचा अजिबात वापर करू नये, असा संकल्प विद्यार्थी, शिक्षकांनी सोडला आहे.
दरवर्षी होळी आली की एक आठवडा अगोदर विद्यार्थ्यांना भेंडीच्या झाडाला येणाऱ्या फळापासून रंग कसा करायचा याचे प्रशिक्षण दिले जाते. त्याप्रमाणे विद्यार्थी पाण्याचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने रंग तयार करतात. धुलिवंदनासाठी अधिकाधिक गुलाल व इतर रंगांचा वापर करण्याची विद्यार्थ्यांना सक्ती केली जाते. डांबर, काळा रंगमिश्रित कोणतेही रंग वापरू नयेत. यामुळेही शरीर स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा अतिवापर होतो, हे विद्यार्थ्यांना पटवून सांगितले जाते. शाळेत पाणीमुक्त होळी अनेक वर्षे खेळली जाते. या वर्षी विद्यार्थ्यांना पाण्याचा काटेकोपर वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाणी काळजीपूर्वक वापरावे. सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा बेसुमार उपसा होत असेल तर नासाडी टाळण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन विद्यार्थी, शिक्षकांना करण्यात आले आहे, असे या शाळेतील शिक्षक अजय पाटील यांनी सांगितले.
पाणीमुक्त धुलिवंदन खेळण्याचा पिसवली शाळेचा निर्णय
विद्यार्थ्यांनी पाण्याचा अजिबात वापर करू नये तसेच गुलाल आणि इतर कोरडय़ा रंगांचा वापर करावा.
Written by झियाऊद्दीन सय्यद

First published on: 16-03-2016 at 05:04 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pisavali school decided to play holi without water