डोंबिवली – कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवलीतील विभागीय कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात कर्मचाऱ्यांचे संख्याबळ कमी असल्याने याठिकाणी जन्म, मृत्यू दाखले मिळविण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. यापूर्वी दोन ते तीन कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही कामे केली जात होती. कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्याने आणि पर्यायी कर्मचारी उपलब्ध न झाल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.

जन्म, मृत्यूचे दाखले घेण्यासाठी डोंबिवली परिसरातील नागरिकांना पालिकेच्या डोंबिवलीतील विभागीय कार्यालयात यावे लागते. याठिकाणी नागरी सुविधा केंद्र आहे. या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना विहित वेळेत दाखले दिले जातात. पण गेल्या काही महिन्यांपूर्वी डोंबिवली नागरी सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अन्य विभागात बदल्या झाल्या. नागरिकांशी दैनंदिन निगडित नागरी सुविधा केंद्र विभाग असल्याने या विभागात पालिकेने तातडीने पर्यायी कर्मचारी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. अनेक महिने उलटले तरी बदली कर्मचाऱ्यांच्या बदल्यात पर्यायी कर्मचारी उपलब्ध न झाल्याने एकाच कर्मचाऱ्याला जन्म, मृत्यूचे दाखले देण्याची कामे करावी लागत आहेत. यापूर्वी नागरी सुविधा केंद्रात दाखल्यांसाठी गर्दी झाली की दोन ते तीन संगणकांच्या माध्यमातून तीन कर्मचारी ही सेवा देत होते. आता एकाच कर्मचाऱ्यावर हा भार आला आहे. या केंद्रातील एक कर्मचारी आजारी असतो. आजारी असेल तर तो कर्मचारी कार्यालयात येत नाही. तेवढा भार एका कर्मचाऱ्यावर पडत आहे.

हेही वाचा – कल्याणमधील तरुणीला अर्धवेळ नोकरीचे आमिष दाखवून १० लाखाला फसवले

जन्म, मृत्यूंचे दाखले वेळेत मिळत नसल्याने नागरिकांना नागरी सुविधा केंद्रात हेलपाटे मारावे लागतात. पारपत्र, बँकविषयक कामे आणि इतर कामांसाठी जन्म, मृत्यू दाखल्यांची नितांत आवश्यकता असते. हे दाखले वेळेत मिळत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. पालिका प्रशासनाने डोंबिवली नागरी सुविधा केंद्रातील कर्मचारी वर्ग वाढविण्यासाठी हालचाली कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.

हेही वाचा – कल्याणमध्ये १२५ किलो बनावट तूप, लोणी जप्त; बाजार परवाना विभागाची कारवाई

नागरी सुविधा केंद्रातील संगणकांचा सर्व्हअर केंद्र शासनाच्या सर्व्हरशी जोडलेला आहे. त्यामुळे कामाचा भार वाढला की सर्व्हअर डाऊन होतो. काम संथगतीने होते. डोंबिवली नागरी सुविधा केंद्रात पुरेसे मनुष्यबळ आहे. मनुष्यबळा अभावी दाखले देण्यास विलंब होत नाही. यामागे तांत्रिक कारण आहे. – प्रमोद कांबळे, सिस्टिम ॲनालिस्ट, संगणक विभाग.