ठाणे : भारत जोडो यात्रेनिमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी हे ठाणे जिल्ह्यात येत असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. परंतु या दौऱ्याच्या नियोजनाबाबत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेबाबत काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ठाण्यात राहुल गांधी येताहेत पण, पत्रकार परिषद भलतेच घेताहेत, असा आरोप करत स्थानिक नेत्यांनी केल्याने पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

भारत जोडो यात्रेनिमित्ताने या आठवड्याच्या अखेरीस ठाणे जिल्ह्यात येणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची यात्रा या भागातील नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा मुंब्रा मतदारसंघातून वळवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात काँग्रेसची फारशी ताकद उरलेली नाही. संघटनात्मक पातळीवर भिवंडीतील ठराविक मतदारसंघापुरते उरलेल्या काँग्रेसने राहुल गांधींच्या यात्रेचा मुक्काम याच भागात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मात्र भिवंडीवरून निघणारी यात्रा खारेगाव टोल नाक्यावरून थेट मुंब्र्याच्या दिशेने जाणार आहे. येथून कळव्यात आणि पुढे ठाण्यातील जांभळी नाका येथे यात्रा येईल. काँग्रेसची जिल्ह्यातील तोळा मासा अवस्था पाहता जितेंद्र आव्हाडांनीच या यात्रेचा बराचसा भार आपल्या खांद्यावर घेतल्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच या यात्रेचा मार्ग हा त्यांच्या कळवा मुंब्र्यातून जाणार आहे.

हेही वाचा – राज्यात पुन्हा १० हजार शिक्षकांची भरती, कोणत्या महिन्यात होणार टीईटी? जाणून घ्या…

या यात्रेच्या मार्गाची माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार राजन विचारे, कॉंग्रेस ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण हे उपस्थित होते. परंतु या यात्रेच्या नियोजनात डावलण्यात आल्याने काँग्रेसचा एक गट नाराज असून त्यांनी यात्रेच्या नियोजनाबाबत स्वतंत्र बैठक घेण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच ठाणे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी या पत्रकार परिषदेबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करत आरोप केले आहेत. ठाण्यात राहुल गांधी येताहेत पण, पत्रकार परिषद भलतेच घेताहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

हेही वाचा – ‘मुह मे मोदी और ठाण्यात भाजप बेनाम’, आमदार संजय केळकर यांची टीका

जितेंद्र आव्हाड कोण ?

राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी देशभरात भारत जोडो यात्रा काढली आहे. महाविकास आघाडीचे नेते या यात्रेत सामील होऊ शकतात. या यात्रेसाठी पक्षाने प्रत्येक ठिकाणी समिती तयार केली आहे. या समितीमार्फत यात्रेचे नियोजन केले जात आहे. असे असताना यात्रेच्या नियोजनाबाबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड हे पत्रकार परिषद कशी घेऊ शकतात. ते कोण आहेत. यात्रेच्या मार्गामध्ये वागळे स्टेट परिसर असताना तो वगळून मुंब्रा परिसर कसा घेण्यात आला, असा सवाल मनोज शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

Story img Loader