पश्चिम, हार्बरवरील उन्नत मार्गापलीकडे एकही घोषणा नाही; सीएसटी-ठाणे मुख्य मार्गाकडे दुर्लक्ष
उपनगरी रेल्वेच्या जादा फेऱ्या, कल्याण-कर्जत शटल फेऱ्या, कल्याण-वाशी लोकलसेवा अशा असंख्य अपेक्षांनिशी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे डोळे लावून बसलेल्या मुंबईकर प्रवाशांच्या पदरी रेल्वे अर्थसंकल्पाने अखेर निराशा पडली. चर्चगेट ते विरार आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल दरम्यानच्या उन्नत मार्गाची उभारणी आणि हार्बर मार्गावरील उन्नत मार्ग मुंबईतील मेट्रोशी एकीकृत करण्याच्या घोषणेपलीकडे प्रभू यांनी मुंबईतील उपनगरी रेल्वे सेवेसाठी एकही आश्वासन दिले नाही. मुंबई उपनगरीय रेल्वेसेवेतील सर्वाधिक गर्दीचा मार्ग असलेल्या सीएसटी-कल्याण या मध्य रेल्वेच्या मार्गावरील प्रवाशांच्या दृष्टीने महत्वाची ठरणारी एकही घोषणा केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली नाही. एकीकडे तिकीट दरांत वाढ न करण्याच्या रेल्वेमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत करतानाच प्रवासी सुविधांच्या पातळीवर हा अर्थसंकल्प ‘व्यर्थसंकल्प’ असल्याची टीका प्रवासी संघटना व तज्ज्ञांनी केली आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी गुरूवारी रेल्वेचा अर्थसंकल्प जाहीर केला. मुंबईच्या सर्वाधिक गर्दीचा भाग असलेल्या मध्य रेल्वेच्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या रेल्वे अर्थसंकल्पाकडून नव्या फेऱ्या, नवे रेल्वे रूळ, शटल सेवा, नवे टर्मिनस अशा अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. शिवाय दिव्यामध्ये झालेल्या आंदोलनाची दखल घेऊन रेल्वे मंत्री या भागासाठी सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. रेल्वे मंत्र्यांच्या संपुर्ण भाषणामध्ये या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी केवळ सहानुभूती शिवाय कोणताच उल्लेख करण्यात आलेला नाही. याउलट ‘वाढत्या गर्दीवर तोडगा म्हणून राज्य सरकारांनी कार्यालयीन वेळांमध्ये बदल करता येईल का, हे पाहावे,’ असा सल्ला प्रभू यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिला. चर्चगेट-विरार आणि सीएसटी-पनवेल या उन्नत मार्गाची घोषणा त्यांनी केली. मात्र गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या या मार्गाना केंद्र सरकारच्या ‘निती’ आयोगाने काही महिन्यांपूर्वीच मान्यता दिली असल्याने त्यात नवीन काही नाही, असे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. सीएसटी-ठाणे हा सर्वात महत्वाचा मार्ग असून त्यावर मोठय़ा प्रमाणात ताण येत असल्याने हा मार्ग उन्नत करण्याची खरी गरज आहे. एमयुटीपी तीनच्या कामांमध्ये महत्वाच्या मार्गाना मान्यता सुध्दा मिळालेली नाही, असा आक्षेप घेतला जात आहे.
टिटवाळा-मुरबाड रेल्वेमार्गासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर जसई-उरण या १० किमीच्या मार्गासाठी १९ कोटी रुपये देण्यात आले आहे. मात्र कल्याण-कर्जतदरम्यान शटल सेवा सुरू करण्याची तसेच कल्याण-वाशीदरम्यान ‘ट्रान्सहार्बर’ वाहतूक सुरू करण्याबाबतही रेल्वे अर्थसंकल्पात कोणताही उल्लेख नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा