टिटवाळा-मुरबाड रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी
कल्याण ते माळशेज घाटमार्गे अहमदनगर हा रेल्वेमार्ग मार्गी लागावा म्हणून ‘माळशेज रेल्वे कृती समिती’ गेल्या ४५ वर्षांपासून रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करीत आहे. या रेल्वेमार्गाचे १९७४ मध्ये सर्वेक्षण होऊन सविस्तर अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. असे असताना तांत्रिक अडथळे, निधीची उपलब्धता, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, अशा अनेक कारणांमुळे रखडलेल्या कल्याण-नगर रेल्वेमार्गातील टिटवाळा ते मुरबाड रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंजुरी दिली आहे.
या रेल्वेमार्गामुळे ४५ वर्षांपासून चर्चेत असलेल्या कल्याण ते नगर रेल्वेमार्गाची कोंडी फुटली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील टिटवाळा शहराचे झपाटय़ाने नागरीकरण होत आहे. महागणपतीचे देवस्थान आहे. लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. नोकरदारांबरोबर उद्योजक, व्यावसायिक या ठिकाणी कायमच्या निवाऱ्यासाठी येत आहेत. टिटवाळ्यापासून पुढे सुमारे ७० किमीवर मुरबाड आहे. मुरबाडमध्ये औद्योगिक वसाहत आहे. विविध शिक्षण संस्था आहेत. तालुक्याचे ठिकाण आणि मोठी बाजारपेठ या ठिकाणी आहे. या भागातील म्हसा गावची जत्रा आणि तेथील गुरांचा बाजार देशभर प्रसिद्ध आहे. शेतकरी भाजीपाला, तबेल्यांमधील दूध नियमित कल्याण, डोंबिवली परिसरात विक्रीसाठी आणले जाते. सरळगाव हे एक बाजारपेठेचे केंद्र आहे. या ठिकाणी नियमित भाजीपाला, गुरांचा बाजार भरतो.
जुन्नर भागातील शेतकरी भाजीपाला घेऊन मुरबाड, सरळगाव, किन्हवली भागात येऊन व्यवसाय करतात. या मार्गातील आताचे सगळे व्यवहार बस, ट्रक, जीप या वाहनांनी होतात. या मार्गावर रेल्वे धावू लागली तर गावांचा विकास होईलच, त्याचबरोबर रोजगाराच्या मोठय़ा संधी निर्माण होतील, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माळशेज घाटमार्गे नगर
कल्याणहून नाशिकमार्गे अहमदनगरला जाण्यासाठी वळसा घेऊन जावे लागते. हाच प्रवास कल्याणहून मुरबाड माळशेज घाटमार्गे आळेफाटय़ावरून केला, तर हेच अंतर सुमारे शंभर ते दीडशे किलोमीटरने कमी होते. या रेल्वेमार्गात माळशेज घाट हे एक तगडे आव्हान रेल्वेसमोर आहे. त्यामुळे हे काम गती घेत नसल्याचे समजते. टिटवाळा ते मुरबाड मार्गानंतर मुरबाड ते नगर या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली तर या मार्गावरील शिवनेरी, हरिश्चंद्रगड, माळशेज घाट या ऐतिहासिक वास्तूंचे महत्त्व वाढेल. तसेच अष्टविनायकांमधील लेण्याद्री, ओझर, कोरथनचा खंडोबा, कापर्डिकेश्वर या तीर्थस्थळांना भेटी देणाऱ्या भाविकांना प्रवासासाठी सुलभ मार्ग उपलब्ध होईल.

कल्याण-नगर रेल्वेमार्गावरील टिटवाळा ते मुरबाड रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास रेल्वेमंत्र्यांनी मंजुरी दिली. ४५ वर्षे हा रेल्वेमार्ग मार्गी लावावा म्हणून माळशेज रेल्वे कृती समिती कार्यरत आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, हेच एक कारण रेल्वेमार्ग रखडण्यामागे आहे.
-दिनेशचंद्र हुलवळे, अध्यक्ष, माळशेज रेल्वे कृती समिती

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway minister suresh prabhu approved survey of titwala to murbad rail rout