कल्याण : अनेक वर्षाच्या आपल्या प्रलंबित विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे ६६ वर्ष नेतृत्व करणाऱ्या मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून (ता.२४) बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

बेमुदत संपावर जाण्याची नोटीस परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांना मोटार वाहन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सरचिटणीस सुरेंद्र सरतापे, पवबा कणखर, दीपक गांगुर्डे यांनी दिली. परिवहन आयुक्तांनी तातडीने सहकारी अधिकाऱ्यांसह कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर गुरूवारी चर्चा केली. या चर्चेत नेहमीप्रमाणे कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींना कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षाच्या प्रलंबित मागण्यांवर अधिकाऱ्यांनी पोकळ आश्वासने दिली. बेमुदत संप मागे घेण्याची गळ घातली. लिखित स्वरुपात आश्वासनांची पूर्तता करण्यास अधिकारी असमर्थ ठरले. त्यामुळे यापूर्वीप्रमाणेच परिवहन अधिकारी आपली बोळवण करत आहेत याची जाणीव झाल्याने मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा…डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटांवरील वर्दळीच्या ठिकाणची उपहारगृहे हटवली

कर्मचाऱ्यांच्या मागण्या

आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामकाजाबरोबर वाहन चालक, मालक हे ग्राहक सेवेचे काम करावे लागते. यामुळे प्रशासकीय कामात गुंतागुंत निर्माण झाली आहे. या दुहेरी कामांच्या बोजामुळे कर्मचारी त्रस्त आहेत. महसुली विभागीय बदल्यांचे धोरण रद्द करण्यात आले नाही. विभागीय परीक्षांमध्ये अनावश्यक बदल करण्यात आले आहेत. आकृतीबंधाची योग्य अंमलबजावणी केली जात नाही. कर्मचाऱ्यांच्या हिताच्या कळसकर समितीच्या तरतुदींची अंमलबजावणी न करणे, बदल्या, बढत्यांमध्ये सेवा ज्येष्ठतेचा विचार न करणे. या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत. मोटार वाहन कर्मचारी संघटनेने वेळोवेळी या मागण्यांविषयी शासनाकडे दाद मागितली आहे. त्याची दखल शासनाने घेतली नाही. केवळ तोंडदेखली आश्वासने देऊन कर्मचाऱ्यांची वेळोवेळी बोळवण करण्यात आली. त्यामुळे यावेळी लेखी स्वरुपात मागण्या मान्य झाल्याचे पत्र परिवहन विभागाकडून दिले जात नाही, तोपर्यंत बेमुदत बंद मागे घेतला जाणार नाही, असे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी सांगितले.

वाहन मालक अस्वस्थ

वाहनांशी संबंंधित कामे आरटीओ कर्मचारी संपामुळे रखडणार असल्याने वाहन मालक अस्वस्थ आहेत. शिकाऊ वाहन प्रशिक्षणार्थी पदाची परीक्षा रद्द होण्या बरोबर वाहनांशी संबंधित सर्व कामे कर्मचारी संपामुळे रखडणार असल्याने वाहन मालकांची आरटीओ कार्यालयात कामे उरकून घेण्यासाठी शुक्रवारी झुंबड उडाली आहे.

हे ही वाचा…डोंबिवलीत मोबाईल वापरण्यास दिला नाही म्हणून तरूणीची आत्महत्या

आरटीओ कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षाच्या मागण्या प्रलंबित आहेत. नवीन प्रशासकीय बदलामुळे कामकाज करताना कर्मचारी त्रस्त आहेत. अशा अनेक मागण्यांकडे शासन लक्ष देत नसल्याने या महत्वपूर्ण विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आरटीओ कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सुरेंद्र सरतापे सरचिटणीस, मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना.