कल्याण : कल्याण ते मुरबाड दरम्यान अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या आठहून अधिक जीप चालकांवर येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. आयुर्मान संपलेली ही वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी दिली. वाहनांची आयुर्मान क्षमता पंधरा वर्षाची असते. या जीप वाहनांचा कालावधी २० वर्षाचा झाला होता. त्यामुळे ही वाहने तोडमोड करून भंगारात काढली जातील, असे परिवहन अधिकारी बारकुल यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण मधील रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रणव पेणकर, कार्याध्यक्ष संतोष नवले यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारकुल यांना पत्र लिहिले होते. कल्याण ते मुरबाड दरम्यान १५ ते २० भंगार अवस्थेमधील जीप धावत असल्याचे निदर्शनास आणले होते. या जीपची आयुर्मान क्षमता संपली असताना ती वाहन चालक, मालकांकडून वापरली जात आहेत. ही जीप वाहने कल्याण पश्चिमेतील मुरबाड रस्त्यावरील महात्मा फुले चौक येथे वाहनतळाची जागा नसताना वर्दळीच्या रस्त्यावर उभी केली जात आहेत. या भागात नेहमी वाहतूक कोंडी होते. एसटी, केडीएमटी बसचे प्रवासी हे अवैध जीप चालक पळवित होते. शासनाचा महसूल बुडत असल्याचे, प्रामाणिक रिक्षा चालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे रिक्षा संघटनेने पत्रात नमूद केले होते.

हेही वाचा…भिवंडीत बांगलादेशींना अटक

रिक्षेचे आयुर्मान पंधरा वर्षाचे झाले की भंगारात काढावी लागते. कल्याण ते मुरबाड धावणाऱ्या जीप १५ वर्षाहून अधिक काळाच्या झाल्यानंतरही वाहन चालकांकडून चालविल्या जात आहेत. या माध्यमातून ते पैसे कमवत आहेत. कल्याण शहराच्या मध्यवर्ति ठिकाणी येऊन ते व्यवसाय करत आहेत. हे माहिती असुनही उपप्रादेशिक परिवहन विभाग त्यांच्यावर कारवाई का करत नाही, असे प्रश्न रिक्षा संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष नवले, उपाध्यक्ष जितेंद्र पवार, सचिव विलास वैद्य यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे उपस्थित केले होते. येत्या आठ दिवसात भंगार जीपवर कारवाई झाली नाहीतर संघटनेने रिक्षा बंदचा इशारा दिला होता.

हेही वाचा…पलावातील व्यावसायिकाकडून लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक

या तक्रारीची गंभीर दखल घेत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कल्याण ते मुरबाड दरम्यान धावणाऱ्या जीप चालकांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारकुल यांच्या उपस्थितीत कारवाई केली. जप्त केलेल्या सर्व जीप मुरबाड बस आगारात ठेवण्यात आल्या आहेत. कल्याण ते मुरबाड दरम्यान धावणाऱ्या आयुर्मान संपलेल्या आठ जीपवर कारवाई केली आहे. या जीप जप्त केल्या आहेत. त्या भंगारात काढण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल. ही कारवाई यापुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे. आशुतोष बारकुल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rto took action against 8 plus jeep drivers illegally transporting passengers between kalyan and murbad sud 02