ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांचा छळ केला आहे, असा गंभीर आरोप करत राज्यात पुन्हा एकदा दिशा सालियन प्रकरण होऊ नये, यासाठी सरकारने तातडीने राऊत यांची चौकशी करावी आणि स्वप्ना पाटकरला न्याय द्यावा, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट ) खासदार नरेश म्हस्के यांनी शनिवारी ठाण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना केली.

उबाठा खासदार संजय राऊत यांच्या मानसिक छळाने त्रस्त झालेल्या स्वप्ना पाटकर यांना न्याय देण्यासाठी शिवसेना महिला आघाडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देणार असल्याचेही खासदार म्हस्के यांनी सांगितले. तक्रारीला ९ वर्ष आणि गुन्हा दाखल होऊ तीन वर्ष झाल्यानंतरही राऊत यांच्यावर पोलीसांनी कारवाई केली नसून यावरून स्वप्ना पाटकर यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार म्हस्के यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन पाटकर यांच्या न्यायाची मागणी केली.

संजय राऊत यांच्याविरोधात वाकोला पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्ह्याची नोंद आहे. राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांना केलेली शिवीगाळ समाज माध्यमांवर उपलब्ध आहे. असे असतानाही राऊत यांना कोण पाठिशी घालत आहे. तसेच राज्यसभा खासदाराला अशा प्रकारे महिलांचा छळ करण्याची कोणी विशेष परवानगी दिली आहे का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असताना त्यांची अद्याप चौकशी का झाली नाही, दिशा सालियनसारख्या तरुणीप्रमाणे आत्महत्या केल्यानंतरच स्वप्ना पाटकर यांना न्याय मिळेल का असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. स्वप्ना पाटकर या पुन्हा न्यायाची मागणी करत आहेत. त्यावर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांची भूमिका काय, असा सवाल म्हस्के यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्राला लागलेला कलंक

संजय राऊत हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, अशी खरमरीत टीका खासदार म्हस्के यांनी केली. राऊत २४ तास केवळ राजकारण करतात. त्यांनी राज्यात एखादी बालवाडी देखील सुरु केली नाही. आता राऊत शरद पवारांवर टीका करत आहेत, हे दुर्देव आहे, असे खासदार म्हस्के म्हणाले. शरद पवारांनी आतातरी राऊत सारख्या कपटी माणसाला दूर ठेवावे, असे खासदार म्हस्के म्हणाले. आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या आजच्या वक्तव्यावरुन त्यांची बांधिलकी हिंदूंशी नसून दंगल करणाऱ्या विशिष्ट समाजाशी आहे, त्यांचा हिरवा चेहरा आज समोर आला, अशी टीका म्हस्के यांनी केली.

Story img Loader