ठाणे : जिल्ह्यातील खडवली या भागात अवैधरित्या चालविल्या जाणाऱ्या बालकांच्या निवासी संस्थेत बालिकांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकार उघडकीस आला आहे. संस्थेत बालकांना जबर मारहाण तसेच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होत असल्याची तक्रार ‘चाईल्ड हेल्प लाईन’वर प्राप्त झाल्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करत २९ बालकांची सुटका केली आहे. या प्रकरणी संस्थेचे संचालक, त्याची पत्नी, मुलगा आणि त्यांना मदत करणारे दोन अशा एकूण पाच जणांविरुद्ध बाल न्याय अधिनियम २०१५ आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खडवली भागातील एका संस्थेमध्ये बालकांना शारीरिक मारहाण केली जात असून लैंगिक अत्याचार होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. या तक्रारीची दखल घेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या पथकाने ११ एप्रिलला पोलिसांना सोबत घेऊन संस्थेची पाहणी केली. या पाहणीदरम्यान आणि बालकांशी संवाद साधल्यानंतर त्यांना शारीरिक इजा पोहोचेल अशा प्रकारे मारहाण तसेच अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. या गंभीर प्रकाराची दखल घेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत संस्थेत असलेल्या २९ बालकांची सुटका केली. यामध्ये २० मुली आणि नऊ मुलांचा समावेश आहे. सुटका केलेल्या सर्व बालकांना बाल कल्याण समितीसमोर उपस्थित करण्यात आले. समितीने बालकांच्या देखरेखेबाबत आदेश देण्याची प्रक्रिया पूर्ण केली. या प्रकरणी संस्थेचा संचालक बबन शिंदे, त्याची पत्नी आशा शिंदे, संचालकाचा मुलगा प्रसन्न शिंदे, त्यांना मदत करणारा प्रकाश गुप्ता आणि दर्शना पंडित या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्वजण खडवली येथील रहिवासी आहेत. सुटका करण्यात आलेल्या बालकांपैकी काही जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होते. त्यांची परीक्षा लक्षात घेता, शिक्षण विभागाने त्यांच्या परीक्षेसाठी विशेष व्यवस्था करावी, यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयाशी समन्वय साधण्यात येत आहे.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने या प्रकरणी तत्परतेने कार्यवाही केली असून, बालकल्याण समितीच्या आदेशानुसार सर्व बालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. सध्या या बालकांना उल्हासनगर येथील मुलींचे विशेषगृह, बालगृह तसेच कनिष्ठ व वरिष्ठ मुलांचे शासकीय बालगृहात दाखल करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी काय म्हणाले ?

बालकांची सुरक्षितता आणि त्यांचे हीत हे प्रशासनाचे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. बालकांच्या शोषणाबाबत आमची भूमिका ‘झीरो टॉलरन्स’ची आहे आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन नेहमीच कटिबद्ध आहे. अशा गैरकृत्यांची तात्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. जेणेकरून भविष्यात कोणीही बालकांच्या भविष्याशी खेळण्याचे धाडस करणार नाही. – अशोक शिनगारे, ठाणे जिल्हाधिकारी.

तात्काळ संपर्क साधा..

– जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले यांनी सांगितले की, आपल्या आसपास कोणत्याही स्वरूपाची बालकांसाठीची निवासी संस्था अनधिकृतपणे चालविली जात असल्यास किंवा बालकांचे शारीरिक, लैंगिक, मानसिक किंवा इतर कोणत्याही प्रकारचे शोषण होत असल्यास, तात्काळ १०९८ या चाईल्ड हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा. बालकांच्या अनधिकृत निवासी संस्था चालवणे आणि त्यांचे शोषण करणे हा बाल न्याय अधिनियमानुसार गंभीर गुन्हा आहे. याबाबत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.