अंबरनाथः अंबरनाथ शहरात पुन्हा एकदा झोपडपट्टीमुक्तीच्या मोहिमेला वेग आला आहे. शहरातील झोपडपट्ट्या मुंबई आणि ठाण्याच्या धर्तीवर विकसीत करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी नुकतीच पालिका मुख्यालयात बैठक पार पडली असून यात प्रकाशनगर भागात सर्वप्रथम ही योजना राबवण्यावर एकमत झाले आहे. या बैठकीला स्थानिक रहिवाशांचीही उपस्थिती होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंबरनाथ शहरातील बहुतांश रहिवासी भाग चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये विभागला आहे. या झोपडपट्ट्यांमुळे शहरात मोठे रस्ते, प्रकल्प उभारण्यात अडचणी येतात. पायाभूत सुविधा पुरवण्यातही अडचणी येत असतात. त्यामुळे या झोपडपट्ट्या हटवून त्या ठिकाणी इमारती बांधण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न झाले. बीएसयुपी योजनाही अंबरनाथ शहरासाठी मंजूर करण्यात आली होती. परंतु लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या निरूत्साहामुळे ही योजना गुंडाळावी लागली. त्यानंतर झोपडपट्टी पुनर्वसनाकडे दुर्लक्ष झाले. गेल्या वर्षात अंबरनाथ नगरपालिकेने शहरातील झोपडपट्टी अधिसूचीत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. ही अधिसूचीत करण्याची प्रक्रिया रहिवाशांच्या आक्षेपामुळे वादात सापडली होती. अंबरनाथ शहरात ५२ झोपडपट्टी असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. सुमारे एक लाख लोकसंख्या या झोपडपट्ट्यांमध्ये राहते. त्यांना पुरेशा सोयी सुविधा देत त्याचा विकास करण्याच्या हेतून शहरात पालिकेने आता पुन्हा झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

हेही वाचा – डोंबिवलीत बनावट मोजणी नकाशाच्या आधारे ११ माळ्याच्या इमारतीची उभारणी; महाराष्ट्रनगर मधील विकासकावर गुन्हा

नुकतीच पालिका मुख्यालयात स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या उपस्थितीत मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे ठाणे विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, मुख्य अभियंता नितीन पवार, राजकुमार पवार, उपजिल्हाधिकारी वैशाली ठाकुर, तहसिलदार स्मिता मोहिते, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, शहरातील बांधकाम व्यावसायिक, वास्तु विशारद आणि प्रकाश नगर येथील रहिवाशांसोबत संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांबाबत मार्गदर्शन आणि सादरीकरण करण्यात आले. अंबरनाथमधील विकासकांना सध्या एक ते दीड चटईक्षेत्र निर्देशांक मिळतो. या योजनेत बिल्डरांनी पुढाकार घेतल्यास त्यांना सातहून अधिक चटईक्षेत्र निर्देशांक वापरण्याची मुभा मिळू शकेल. झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी बिल्डरांनी पुढाकार घेत प्रस्ताव तयार केल्यास या प्रकल्पासाठी प्राधिकरणाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही या बैठकीत प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली. तर अंबरनाथ नगरपालिकेनेही १० झोपडपट्ट्यांच्या विकासाचा प्रस्ताव सादर करण्याची तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा – ठाणे : गृहसंकुलातील गरबा प्रशिक्षणास मोठा प्रतिसाद

अंबरनाथ पूर्वेतील शहराच्या वेशीवर शिवमंदिराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या प्रकाश नगर झोपडपट्टीत पहिला प्रकल्प राबवला जाणार आहे. त्यासाठी या भागात बायोमेट्रीक सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आलेले आहे. २०११ पूर्वीच्या पात्र रहिवाशांना घरे मिळतील, अशी माहिती अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Slum rehabilitation project in ambernath movement for first project in prakashnagar area ssb
Show comments