अंबरनाथः अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यांन गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चिखलोली रेल्वे स्थानकाच्या उभारणीला वेग येणार आहे. फलाटाच्या निर्मितीसह इतर कामांसाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या वतीने ८१ कोटी ९३ लाख रुपयांच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या प्रत्यक्ष उभारणीच्या कामाला सुरुवात होणार आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान दोन्ही दिशेला गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर गृहसंकुले उभी राहिली. येथील चिखलोली हा परिसर वेगाने विकसित झाल्याने येथे लोकसंख्या पर्यायाने प्रवाशांची संख्याही वाढली. त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर या रेल्वे स्थानकांच्या दरम्यान नवे स्थानक उभारण्याची मागणी होत होती. स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून या स्थानकाच्या उभारणीसाठी सातत्याने प्रयत्न केले जात होते. २०१९ या वर्षात या स्थानकाच्या प्रत्यक्ष कामाची प्रक्रिया सुरू झाली. २०२० मध्ये या स्थानकाच्या कामासाठी आवश्यक जागेची पाहणी रेल्वे प्रशासनाने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आणि तहसील प्रशासनाच्या उपस्थितीत केली होती. त्याबाबतची अधिसूचना यापूर्वीच जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे चिखलोली स्थानकाच्या उभारणीला गती मिळाली. डिसेंबर २०२० मध्ये मध्य रेल्वेच्या वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापकांनी चिखलोली स्थानकाच्या थांब्याला अधिकृत मंजुरी दिली होती. रेल्वे प्रशासनाने चिखलोली स्थानकाचे इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषेतील नाव आणि त्याची अक्षरे निश्चित केली होती. यावेळी चिखलोली स्थानकाचा रेल्वे प्रशासनाचा सांकेतिक क्रमांक, त्याचे संक्षिप्त नावही रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते. रेल्वे आणि इतर खासगी मोबाईल ॲप आणि संकेतस्थळांवर या स्थानकाचे नावही दिसू लागले होते. त्यानतंर काही काळ निधीच्या उपलब्धतेवरून थंडावले होते. परंतु राज्याचा हिस्सा उपलब्ध झाल्यानंतर आता अखेर या स्थानकाच्या उभारणीच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा मार्गी लागला आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या वतीने या स्थानकाच्या निर्मितीसह इतर संलग्न कामांसाठी ८१ कोटी ९३ लाख रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या स्थानकाच्या प्रत्यक्ष उभारणीचे काम लवकरच सुरू होण्याची आशा आहे.

हेही वाचा – आता मुरबाडपर्यंत गोदामांच्या रांग; भिवंडीचे व्यापार केंद्र विस्तारण्याच्या हालचाली

प्रवाशांना होणार फायदा

सध्याच्या घडीला चिखलोली आणि विस्तारीत बदलापुरातील प्रवाशांना अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकात लोकल पकडण्यासाठी जावे लागते. परंतु चिखलोली स्थानकाच्या उभारणीनंतर प्रवाशांचा वेळ आणि प्रवासखर्च वाचणार आहे.

हेही वाचा – उल्हास नदीत वाहनांची यथेच्छ धुलाई, रिक्षा, दुचाकी थेट नदी पात्रात, पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी

सध्या मला चिखलोली भागातून अंबरनाथ रेल्वे स्थानकात जाण्यासाठी दररोज ६० ते ८० रुपये खर्च करावे लागतात. या रेल्वे स्थानकामुळे आम्हाला फायदा होणार आहे. – किरण यादव, रेल्वे प्रवासी.

Story img Loader