बदलापूर : राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी जाहिर केलेल्या ब्राह्मण समाजासाठीच्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. या महामंडळाच्या अध्यक्षपदी बदलापूरच्या आशिष दामले यांनी निवड करण्यात आली आहे. आशिष आनंद दामले हे राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यांच्या या नियुक्तीमुळे ठाणे जिल्ह्यात पक्षाला बळ देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा रंगली आहे.

सप्टेंबर महिन्यात राज्य सरकारने विविध जाती आणि समुहांसाठी आर्थिक विकास महामंडळांची स्थापना केली. यात ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचीही स्थापना करण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. या समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील युवक युवतींना शैक्षणिक तसेच व्यवसायासाठी महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न आहे. या महामंडळाचे कार्यालय पुण्यात प्रस्तावित करण्यात आले आहे. तर या महामंडळाला ५० कोटींचे भागभांडवल दिले जाणार आहे. या महामंडळाची घोषणा झाल्यानंतर यावर कुणाची वर्णी लागणार, तसेच महायुतीमधील कोणत्या पक्षाच्या खात्यात हे महामंडळ जाणार अशी चर्चा रंगली होती.

हे ही वाचा…भाजपच्या मुरबाडवर शिवसेनेचा दावा, शिवसेनेचे वामन म्हात्रे, सुभाष पवार एकनाथ शिंदेंच्या भेटीला

अखेर हे महामंडळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडे गेले आहे. १४ ऑक्टोबर रोजी या महामंडळाच्या अध्यक्षपदी बदलापुरचे आशिष दामले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आशिष आनंद दामले हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत. दामले हे शरद पवार, अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात. राष्ट्रवादीतील फुटीनंतर त्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला होता. आशिष दामले हे कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्षही राहिले आहेत. त्यांनी विविध उपक्रमांमधून आपली ओळख निर्माण केली आहे. दामले यांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात पक्षाला बळ देण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केल्याची चर्चा या निर्णयानंतर रंगली आहे.

हे ही वाचा…डोंबिवली पश्चिमेत अभूतपूर्व वाहन कोंडी, रिक्षा संघटनेचा आंदोलनाचा इशारा

प्रतिक्रियाः राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना यासाठी संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या महामंडळाला न्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल. – आशिष आनंद दामले, अध्यक्ष, परशुराम आर्थिक विकास महामंडळ.