ठाणे : एकीकडे राज्याचा विकास करणारे महायुतीचे सरकार आहे तर, दुसरीकडे राज्याचा विकास रोखणारे महाविकास विकास आघाडीचे सरकार आहे, अशा महाविकास विरोधी शत्रूंना सत्तेबाहेर रोखा आणि महायुतीचे प्रामाणिक सरकार निवडून द्या, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना सांगितले. काँग्रेस पक्ष हा लूट, भ्रष्टाचार आणि कुशासनचे पॅकेज असल्याची टीकाही त्यांनी केली.

घोडबंदर येथील कासारवडवली भागातील वालावलकर मैदानात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्ण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्री, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँगेसवर सडकून टीका केली.

हेही वाचा – Narendra Modi Marathi Speech : “महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी घेऊन आलोय…”, ठाण्यात येताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जनतेशी मराठीतून संवाद; म्हणाले…

राज्यात महायुतीचे सरकार विकसित राज्याचे लक्ष्य ठेवून काम करीत आहे. पण, त्यासाठी विकास कामे करण्याबरोबरच काँग्रेसने केलेले खड्डे भरणे अशी दुहेरी मेहनत करावी लागत आहे. राज्यात काँग्रेस इतके वर्षे सत्तेत होती पण, त्यांनी वाहतूक कोंडी तसेच विकास कामांकडे लक्ष दिले नाही. यामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ठप्प होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती, असा आरोप मोदी यांनी केला. आमच्या सरकारने कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगरात मेट्रोचे जाळे विणले, सागरी किनारी मार्ग, अटल सेतू असे मार्ग निर्माण केले. असे अनेक प्रकल्प आहेत, त्याची यादी वाचली तर बराच वेळ लागेल, असेही ते म्हणाले.

महायुती सरकार महाराष्ट्राच्या विकासाचे ध्येय ठेवून काम करते. परंतु महाविकास आघाडीकडून ही कामे रोखण्यात आली. मुंबई मेट्रो ३ हे त्याचे उदाहरण आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना या मेट्रो प्रकल्पाचे ६० टक्के काम पूर्ण झाले होते. परंतु महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच त्यांनी काम थांबवले. यामुळे प्रकल्प किमतीत १४ हजार कोटींची वाढ झाली. हा पैसा राज्यातील करदात्यांचा होता, अशी टीकाही त्यांनी केली. महाविकास आघाडी सरकार नव्हे तर हे महाविकास विरोधी लोक आहेत. त्यांनी अटल सेतू, बुलेट ट्रेन असे प्रकल्प रोखून धरले. दुष्काळ भागातील पाणी प्रकल्प अडविण्याचे काम केले. म्हणूनच अशा विकासशत्रूंना सत्तेबाहेर रोखा, असे आवाहन मोदी यांनी केले.

हेही वाचा – शहाड उड्डाणपुलाची कोंडी फुटणार, एमएमआरडीएकडून निविदा जाहीर, चारपदरी उड्डाणपूल होणार

काँग्रेस पक्ष हा बेईमान आणि भ्रष्ट पक्ष आहे. या पक्षाचे खरं रंग जनतेसमोर आलेले आहेत. आम्ही सर्वत्र शौचालय उभारणीवर लक्ष देत आहोत. मात्र काँग्रेस त्यांची सत्ता असलेल्या राज्यामध्ये शौचालयांवरती कर लावत आहेत. काँग्रेस पक्ष निवडणुकीत मोठ मोठ्या घोषणा करते पण निवडणुका झाल्यानंतर लोकांचे शोषण कसे करता येईल यावर काम करते, असा आरोपही त्यांनी केला. राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मात्र या योजना कशा बंद करता येतील याची संधी महाविकास आघाडी शोधत आहे. महाविकास आघाडी सत्तेत आली तर विकास कामे करणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राग काढेल आणि त्यांनी सुरू केलेल्या सर्व योजनांना टाळे लावेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.