अंबरनाथ: ज्याप्रमाणे देशाचे पंतप्रधान आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा धर्माचा कित्ता एकनाथ शिंदे गिरवतात, अशी स्तुतीसुमने अयोध्येच्या राम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर उधळली. अंबरनाथच्या शिव मंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी गोविंदगिरी महाराज बोलत होते. तर अमरनाथ प्रमाणे काही वर्षात शिव मंदिराचा विकास झाल्यानंतर लोक चलो अंबरनाथ सुद्धा म्हणतील, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शिव मंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर विकसित केला जातो आहे.
हेही वाचा >>> कल्याण ते तळोजा मेट्रो १२ कामाला अखेर सुरुवात, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज कामास आरंभ
अंबरनाथ शहरात असलेल्या शिलाहार कालीन शिव मंदिराच्या परिसराच्या विकासासाठी १५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या मंदिराच्या कामाचे भूमिपूजन रविवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि अयोध्येच्या राम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबरनाथ शहरात सुरू असलेल्या विकास कामावरून खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार डॉ बालाजी किणीकर आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे कौतुक केले. अंबरनाथ या शहराचा विकास उंचीवर पोहोचला आहे.
अंबरनाथ हे वाढतं शहर आहे. वाढत्या शहराची गरज लक्षात घेऊन आपण विकासाला कुठेही पैसे कमी पडू देणार नाही ही खात्री आपल्याला मी देतो, असे शिंदे यावेळी म्हणाले. राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान महत्त्वाचे आहे यांच्या आशीर्वादाने आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना बळ, प्रेरणा आणि ऊर्जा मिळते, असेही शिंदे म्हणाले. तर आपल्या भाषणात गोविंदगिरी महाराज यांनी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे कौतुक केले. देशाने गेल्या १० वर्षात कात टाकली आहे. कलम ३७० हटेल, काशी विश्वेश्वर दिमाखात उभा राहील, उज्जैनच्या महाकालचा कायापालट होईल, एखादा पंतप्रधान समुद्राच्या तळाशी जाऊन द्वारकेचे दर्शन घेईल असे कधीही वाटले नव्हते, असे गोविंदगिरी म्हणाले. जसे देशात पंतप्रधान दिल्लीत बसले आहेत, तसेच मुख्यमंत्री महाराष्ट्रात बसले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण करण्याचा चंग या दोघांनी बांधला आहे, असेही ते म्हणाले. जो कित्ता बाळासाहेब ठाकरे गिरवत होते, तोच कित्ता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गिरवतायत, असे सांगत त्यांनी शिंदे यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले.
हेही वाचा >>> कल्याण ते तळोजा मेट्रो १२ कामाला अखेर सुरुवात, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज कामास आरंभ
मुख्यमंत्र्यांची फर्माइश “महाभारत” गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या शिव मंदिर आर्ट फेस्टीव्हलचा शेवटचा दिवस सोनू निगम याच्या सुराने गाजला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाभारत गाण्याची फर्माइश केली. सोनू निगम याने तात्काळ गाणे गायले. त्यानंतर लगेचच खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी रामायण गाण्याची मागणी केली. पिता पुत्रांच्या या गाण्याच्या मागणीने उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला.