बदलापूर: शासनाच्या प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील चुकीच्या धोरणात विरोधात राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी शासनाविरोधात आंदोलनाचा निर्णय घेतला असून ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षक येत्या बुधवार, २५ सप्टेंबरला सामूहिक रजा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे या दिवशी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद राहणार आहेत.

१५ मार्च रोजी शिक्षक संच मान्यता आणि ५ सप्टेंबरच्या कंत्राटीत शिक्षक भरती संदर्भातल्या शासन निर्णयामुळे २० पट असलेल्या शाळेमध्ये एक कायम तर एक कंत्राटी शिक्षक नेमला जाणार आहे. आधारवर संचमान्यता होत असल्याने दुर्गम भागात विद्यार्थी अधिक आहे. मात्र आधार नोंदणी नसल्याने अनेक शिक्षकांची पदे कमी होणार आहे.

हे ही वाचा…नेरुळ विभागात अनधिकृत झोपड्यांवर पालिकेची कारवाई

त्यामुळे शासनाचे हे धोरण डोंगरी दुर्गम भागातील तसेच वाडी- वस्तीवर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहेत. शासनाच्या या निर्णयाविरोधात विद्यार्थी, शिक्षक पालकांमध्ये असंतोष आहे. तसेच शिक्षकांच्या अनेक मागण्या देखील आहेत. या मागण्यांचा पाठपुरावा आणि शासकीय धोरणांचा विरोध करण्यासाठी सर्व शिक्षक संघटनांनी त्रिस्तरीय असहकार आंदोलन पुकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या बुधवारी ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद राहणार आहेत, अशी माहिती शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष संजय घागस यांनी दिली आहे.