ठाणे – जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये मंगळवारी २८ निष्पाप पर्यटकांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. या बातमीने सर्वांच्या अंगावर काटा आला आणि मन सुन्न झाले. या घटनेनंतर समाज माध्यमांवरसंतापजनक प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यातच, ठाण्यातील दत्तात्रय चितळे या गृहस्थांनी आठ वर्षापूर्वी काश्मीर मध्ये त्यांना आलेला अनुभव लोकसत्ताशी बोलताना उलगडला.
दत्तात्रेय चितळे म्हणतात, पहलगाम येथील भ्याड हल्ल्याची बातमी वाचली आणि आठवणींचा पूर वाहायला लागला. सुमारे आठ वर्षांपूर्वी चितळे आणि त्यांच संपूर्ण कुटुंब – काश्मीरच्या सहलीला गेले होते.
श्रीनगर विमानतळावर उतरल्यावर त्यांना एक मोठी गाडी घ्यायला आली. या गाडीच्या चालकाचे नाव हमीद असे होते. या गाडीने त्यांनी दल लेकमधील हाऊसबोटकडे प्रवास सुरू केला. प्रवासादरम्यान हमीद सहज बोलता बोलता चितळे ना म्हणाला, “आपके हिंदुस्तान से लोग आते हैं, इसलिए हमारा पेट चलता है।” त्या एका वाक्याने त्यांचा संताप अनावर झाला – “तुझा काय पाकिस्तान आहे का?” असं ओरडून त्यांना विचारावं वाटलं, परंतु त्यांना आधीच सूचना दिल्या होत्या येथील स्थानिकांशी वाद घालायचा नाही. त्यामुळे राग गिळून त्यांना गप्प बसावं लागले, असे चितळेंची सांगितले.
दोन दिवसांनी चितळे आणि त्यांचे कुटुंबीय गुलमर्गवरून परत श्रीनगरकडे निघाले. त्यावेळी रस्त्यावर एका झोपडीमधून १२ ते २० वयोगटातील ६-७ मुले अचानक आमच्या बसवर दगडफेक करू लागली. एक मोठा दगड चालकाच्या काचेला लागून ती फुटली. या घटनेमुळे बसमधील सर्व प्रवासी एकदम गोंधळून गेल्याचे चितळे सांगतात. त्यावेळी चालकाने सर्वांना झुकून बसायला सांगितलं. त्या क्षणी, जीव खरंच मुठीत गेला होता. पण, त्या चालकाने दिलेली गती, ते भन्नाट ड्रायविंग – आयुष्यात कधी विसरणार नाही. ज्या रस्त्याला सव्वा दोन तास लागले असते, तिथे आम्ही एक तासात हॉटेलवर पोहोचलो, असा थरारक अनुभव चितळे यांनी उलगडला.
दुसऱ्या दिवशी चितळेंना समजले की, जर त्या मुलांनी बस थांबवली असती, तर त्यांनी आधी चालकाचा खात्मा करुन मग आपल्यावर हल्ला केला असता. त्यामुळे चितळे आणि त्यांचे कुटुंब पूर्णपणे घाबरून गेले.
उर्वरित चार दिवस आम्ही काश्मीरमध्ये जीव मुठीत घेऊनच फिरलो असल्याचे त्यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्या नंतर पुन्हा आठ वर्षापूर्वी जम्मू काश्मीरच्या सहलीला आलेला भयानक अनुभव डोळ्यासमोरून गेला असल्याचे चितळे सांगतात.
© The Indian Express (P) Ltd