ठाणे : येथील महापेकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांच्या काचा तोडून बॅग आणि मौल्यवान वस्तुंची चोरी करणाऱ्या दोघांना ठाणे गुन्हे शाखेच्या घटक १ ने अटक केली आहे. अरविंद जाटव (२६) आणि साहिल कुमार जाटव (२४) असे या दोन आरोपींची नावे आहेत.ठाणे येथील घोळ गणपती परिसर महापेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या वाहनाच्या काचा तोडून वाहनातील बॅग आणि मौल्यवान वस्तुंची चोरी करणारे दोन अज्ञात आरोपी येणार आहेत, अशी माहिती ठाणे गुन्हे शाखा घटक १ ला मिळाली.
या माहितीच्या अनुषंगाने, गुन्हे शाखा घटक १ ठाणे च्या पोलीस पथकाने घोळ गणपती परिसरात महापेकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला असता,पोलिसांना तेथे दोन आरोपी संशयास्पद स्थितीत दुचाकी वाहनावर दिसले. त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असताना, हे आरोपी नवी मुंबईच्या दिशेने पळाले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना वाशी येथील सेक्टर ११ येथे पकडले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी त्यांची नावे अरविंद आणि साहिल असल्याचे सांगितले. तसेच ते मुळचे राजस्थानचे असून सध्या वाशी येथील जुहूनगर परिसरात ते राहत आहेत.
याप्रकरणी त्यांची अधिक चौकशी केली असता त्या दोघांनी ठाणे, नवी मुंबई, परिसरातील शिळडायघर,खारघर, पनवेल, कोपरखैरणे या भागातही दुचाकी आणि बॅग चोरी केल्याचे उघड केले असून चारही पोलीस ठाण्यात गुन्हे उघडकीस आले आहेत. या आरोपींच्या ताब्यातून वाहनांच्या काचा फोडण्यासाठी वापरण्यात येणारे ब्रेकर, मोटर सायकल, चोरलेल्या बॅगा, कागदपत्रे तसेच पेपर स्प्रेची बाटली इत्यादी मुद्देमाल हस्तगत केला आहे.