ठाणे : राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह सात जणांविरोधात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे तपास सुरू करून मला आणि इतर व्यवसायिकांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकविण्याची धमकी देऊन आमच्याकडून पैसे उकळले असे तक्रारीत म्हटले आहे. या गुन्ह्यामुळे आता संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

माजी पोलीस महासंचालक संजय पांडे, माजी साहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील, तत्कालीन पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, वकील शेखर जगताप, श्यामसुंदर अग्रवाल, शुभम अग्रवाल, शरद अग्रवाल यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मे २०२१ ते ३० जून २०२४ या कालावधीत हा गुन्हा घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा…Dahi Handi 2024 Celebration : अडीच वर्षांपुर्वी पापाची हंडी फोडली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई येथे व्यवसायिक संजय पुनमिया वास्तव्यास आहेत. मिरा भाईंदरमध्ये काही विकासकांनी युएलसीच्या सवलतीसाठी बनावट प्रमाणपत्रे मिळवली होती.या बनावट पत्राच्या आधारे विकासकांनी महापालिकेकडून परवानग्या घेऊन इमारतींचे बांधकाम केले आणि शासनाची आर्थिक फसवणूक केली होती. याप्रकरणी २०१६ मध्ये ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. संजय पुनमिया यांच्याविरोधात देखील हा गुन्हा दाखल होता. हे प्रकरण २०२१ मध्ये पुन्हा उघडण्यात आले होते. हे खोटे प्रकरण पुन्हा उघडून राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी या प्रकरणात खोट्या पद्धतीने अडकविण्याची धमकी देऊन पैसे उकळल्याचा आरोप पुनमिया यांनी केला आहे. तसेच, शासनाचे खोटे पत्र तयार करून विशेष सरकारी वकिल नेमण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात माजी पोलीस महासंचालक संजय पांडे, साहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील, तत्कालीन पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, वकील शेखर जगताप, श्यामसुंदर अग्रवाल, शुभम अग्रवाल, शरद अग्रवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामुळे पांडे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.