ठाणे : सध्या तीव्र उन्हाळा असल्याने धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत असून यामुळे ठाणे महापालिकेने पाणी बचतीसाठी पाऊले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील सर्व सर्व्हिस सेंटरमध्ये १६ एप्रिल ते १० जूनपर्यंत वाहने धुणे, पाण्याने वाहने साफसफाई करण्यास पालिका प्रशानसाने बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन ६१६ दशलक्षलीटर इतका पाण्याचा कोटा मंजुर आहे. प्रत्यक्षात शहराला दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. त्यातच उन्हाळा सुरू झाल्यानंतर शहरात पाणी टंचाईची समस्येत आणखी वाढ होत असून यंदाच्या वर्षीही हेच चित्र कायम आहे. सध्या तीव्र उन्हाळा असल्याने धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. पावसाळा सुरू होईपर्यत तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन ठाणे महापालिका प्रशसानाने ठाणेकरांना केले आहे. त्यापाठोपाठ आता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व सर्व्हिस सेंटरमध्ये दूचाकी, तीन चाकी, चारचाकी वाहने, मोठी वाहने धुणे, तसेच पाण्याने साफसफाई करणे यासाठी पालिकेने बंदी घातली असून ही बंदी १६ एप्रिल ते १० जून पर्यंत लागू राहणार आहे.

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार पाणी पुरवठा विभागाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या सर्व्हिस सेंटरवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमांनुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शक्यतो दररोज गाड्या धुतल्या जावू नयेत. त्याऐवजी बोअरवेलच्या पाण्याने ओल्या केलेल्या कपड्याने गाड्या पुसाव्यात, अशी सूचना महापालिकेने नागरिकांना केली आहे.

पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा अत्यल्प असल्याने एक जबाबदार नागरिक म्हणून पाण्याचा अपव्यय टाळूया. पाणी वाचवूया आणि संभाव्य पाणीटंचाईचा सामना एकत्रितपणे करूया, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. याबाबत ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.