ठाणे : कोकणातील लोकसभेच्या जागा षडयंत्राने महायुतीने जिंकल्या. यंदाच्या लोकसभेत धनशक्तीचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. प्रशासनाला त्याच्यामध्ये वापरले गेले. अन्यथा राजन विचारे आणि विनायक राऊत यांचा पराभव होण्याचे कारणच नव्हते, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

हेही वाचा – कल्याणमधील तरुणीची लग्नाचे आमिष दाखवून ठाण्यातील तरुणाकडून ६० लाखाची फसवणूक

हेही वाचा – पराभवानतंरही कपिल पाटील यांच्या बैठकांच्या धडाक्यामुळे किसन कथोरे समर्थक अस्वस्थ

कोकण पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ गुरुवारी नाना पटोले हे ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी महायुती सरकारवर टीका केली. राज्यात बेरोजगारांची संख्या मोठी आहे पण सरकार नोकर भरती करत नाही. महाराष्ट्र हे बेरोजगारांचे राज्य झाले आहे. गाझामध्ये सुरु असलेले युद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थांबवले असा दावा करतात पण देशातील पेपरफुटी मात्र मोदी थांबवू शकत नाहीत. नीट परिक्षेतील पेपरफुटीमुळे लाखो मुलांचे भवितव्य अंधारात नेण्याचे पाप भाजपा सरकारने केले आहे. विधान परिषदेची निवडणूक एकजुटीने लढून जिंकू आणि विरोधकांची हवा काढून घेऊ. या निवडणुकीत महायुतीचा फुगा सुशिक्षितांनी फोडला तर आगामी निवडणुकीत त्याचा परिणाम दिसेल म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे. मुंबईतील दोन जागा, नाशिक व कोकण या चारही मतदारसंघात महाविकास आघाडी एकदिलाने निवडणूक लढत आहे. या निवडणुकीत धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीच्या उमेदवाराला निवडून द्यावे, असेही पटोले म्हणाले.