ठाणे : उत्तरप्रदेश येथून अल्पवयीन भाचीचे (मेहूणीच्या मुलीचे) अपहरण करून तिला वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या एका ४० वर्षीय दलालाला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. त्याच्याविरोधात डिसेंबर महिन्यात उत्तरप्रदेश येथील पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होता. या दलालाला १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी त्याच्या तावडीतून भाचीचे आणि एका महिलेची सुटका केली आहे.
डायघर येथील गोठेघर फाटा परिसरातील ढाब्यावर महिला आणि अल्पवयीन मुलींची फसवणूक करून त्यांना वेश्या व्यवसायात ढकलणारा दलाल येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त अमरसिंह जाधव, साहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे, एन.डी. क्षीरसागर, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक वालगुडे, दीपक भोसले, पोलीस हवालदार किशोर पाटील, आर. यु. सुवारे, अंमलदार हर्षदा थोरात, पी.जी. खरात, पोलीस शिपाई उदय घाडगे यांच्या पथकाने ढाब्याच्या परिसरात सापळा रचला.
दरम्यान, तो आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने तो कल्याण येथील राहणारा असून महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची कबूली त्याने दिली. याप्रकरणात पोलिसांनी त्याच्या तावडीतून नवी मुंबई येथील एका महिलेची आणि त्याच्या १६ वर्षीय भाचीची सुटका केली. तसेच त्याच्या विरोधात शिळ – डायघर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ९६, १४३ (१), १४३ (३) सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमन २०१२ चे कलम १७ सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९९६ चे कलम ४ आणि ५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्याला अटक करून त्याची चौकशी केली असता, त्याने भाचीचे उत्तरप्रदेश येथून अपहरण केल्याची कबूली दिली. तसेच त्याच्याविरोधात तेथील दोहरीघाट पोलीस ठाण्यात १ डिसेंबर २०२४ ला अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याला १० मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांनी सांगितले.