ठाणे– मुंबई तसेच उपनगरात रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. या पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावरील भांडुप आणि नाहूर रेल्वे स्थानकात पाणी साचल्याने ठाणेहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाड्या रद्द करण्यात येत होत्या त्यामुळे सकाळी लवकर कामासाठी निघणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. काही काळानंतर पावसाचा जोर कमी झाल्यावर येथील रेल्वे सेवा पूर्ववत झाली परंतु, रेल्वे गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. तर ट्रान्स हर्बल मार्गावरील लोकल गाड्याही अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहेत.
मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने रविवारी रात्रीपासून मुंबई आणि उपनगरात पुन्हा हजेरी लावली. रात्रीपासून सुरू झालेला हा पाऊस मध्यरात्रीही कायम होता या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले तसेच या पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही पडलेला दिसून आला. या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावरील भांडुप आणि नाहूर स्थानकात पाणी साचले होते, त्यामुळे कर्जत कसाराहून सीएसएमटीकडे निघालेल्या लोकल गाड्या ठाणेपुढे जात नव्हत्या. यामुळे ठाणे स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. काही काळानंतर पावसाने उसंती घेतली. भांडुप आणि नाहूर रेल्वे स्थानकातील पाणी ओसरल्यानंतर ही रेल्वे सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात आली. परंतु या लोकल गाड्या वीस ते पंचवीस मिनिटं उशिराने धावत होत्या. याचा फटका नोकरदार वर्गाला बसला.
हेही वाचा – मुसळधार पावसामुळे कल्याण, डोंबिवली, टिटवाळा परिसरातील प्रवासी रेल्वे स्थानकातून घरी
हेही वाचा – ठाणे, पालघरमध्ये मुसळधार; कल्याण-कसारा रेल्वे वाहतूक ठप्प, प्रवाशांचे अतोनात हाल
अंबरनाथ तसेच बदलापूर येथून मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल तब्बल वीस ते पंचवीस मिनिट उशिराने धावत होत्या. यामुळे अनेक प्रवाशांनी घरची वाट धरली. तर, विविध ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या अडकून पडल्याचे चित्र आहे. याच पद्धतीने अंबरनाथ येथे महालक्ष्मी एक्स्प्रेस सकाळी ७ वाजल्यापासून थांबवून ठेवली आहे. यामुळे एक्स्प्रेसमधील प्रवाशांकडून मोठा रोष व्यक्त करण्यात येत आहे. तर ट्रान्स हर्बल मार्गावरील लोकल गाड्याही अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहेत.
© The Indian Express (P) Ltd