ठाणे – जिल्ह्यातील बेघर, निराधार आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा महिला आणि बालविकास विभागातर्फे सुरू करण्यात आलेला फिरत्या शाळेचा उपक्रम निधी अभावी गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून बंद असल्याचे उघड झाले आहे. तर नुकतीच आचार संहिता जाहीर झाल्याने यासाठी निधीची पूर्तता होणे देखील अपेक्षित नसल्याने हा प्रकल्प अजून काही महिने बंदच राहणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. मात्र या फिरत्या शाळेवर अवलंबून असलेल्या अनेक निराधार विद्यार्थ्यांना मात्र उत्तम आणि मोफत शिक्षणाला मुकावे लागले आहे.

राज्य शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागातर्फे बेघर मुलांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी गेल्या दीड वर्षापूर्वी जिल्ह्यात फिरती शाळा उपक्रम हाती घेण्यात आला होता. राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये एकत्रितरित्या हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली होती. ठाणे जिल्हा महिला आणि बालविकास विभागाच्या देखरेखीखाली सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये एका फिरत्या बसद्वारे मुलांना त्यांच्या राहत्या विभागात जाऊन शिक्षण दिले जाते. यामध्ये प्रामुख्याने झोपडपट्टी विभाग, उड्डाणपूल, सिग्नल या ठिकाणी राहणारी मुले यांना शिक्षण देण्यात येत होते. यासाठी संस्थेच्या माध्यमातून नियुक्त केलेले शिक्षण विद्यार्थ्यांना नियमित स्वरूपात शिक्षण देत होते. यासाठी लागणारा निधी राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाकडून संबंधित संस्थेला देण्यात येत होता. सुरुवातीच्या सहा ते सात महिन्यांच्या काळात राज्य शासनाकडून यासाठी नियमित स्वरूपात निधी आला मात्र त्यानंतर निधीच आला नसल्याने जिल्हा प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला. यामुळे अखेरीस निधी अभावी हा प्रकल्प महिला आणि बालविकास विभागाला बंद करावा लागला. तर या प्रकल्पासाठी निधी मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे पाठपुरावा केला जात असल्याची माहिती जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

हेही वाचा – ठाणे : एमटीएनएल इंटरनेट सेवा वारंवार ठप्पचा परिणाम शिधावाटप कार्यालयाच्या कामाकाजावर

स्त्युत उपक्रम बंद

या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात १७० बालकांना शाळेत प्रवेश देण्यात आला. तर दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई आणि अंबरनाथ नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील तब्बल ४५० ते ५०० बालकांना यंदाच्या शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला. यामुळे शेकडो मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली.

आर्थिक बाजू असक्षम

हा प्रकल्प राबविण्यासाठी शासनाकडून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ११ लाख रुपयांचा निधी देणे आवश्यक होते. मात्र केवळ पाहिल्या सहा महिन्यांचा निधीच शासनाकडून देण्यात आले आहे. त्यानंतर एकदाही शासनाकडून निधी देण्यात आलेला नाही. यामुळे सामाजिक संस्था हा प्रकल्प स्वतः चालवत होती. मात्र आता निधी उपलब्ध न होऊन बराच मोठा कालावधी उलटल्याने संस्थांच्या आर्थिक मर्यादा असल्याने नाईलाजाने हा प्रकल्प बंद पडला आहे.

हेही वाचा – बहिणीशी बोलतो म्हणून उल्हासनगरमध्ये तरुणाला लोखंडी सळईने मारहाण

फिरत्या शाळेमुळे जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता आले आहे. राज्य महिला आणि बालविकास आयुक्तालय आणि ठाणे जिल्हा महिला बाल विकास विभाग यांच्या माध्यमातून प्रकल्प पुन्हा सुरळीत ठेवण्यासाठी आणि निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. – महेंद्र गायकवाड, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी, ठाणे