ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय महिलेने बनावट कागदपत्रांच्या आधारे पारपत्र तयार करून पाकिस्तान गाठल्याचे समोर आले होते. महिलेने पाकिस्तानात जाऊन तेथील एका तरुणासोबत निकाह केला. त्यानंतर ती भारतात परतल्याचे समोर आले आहे. दरम्यान, तिच्याविरोधात बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तिची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी आता तिची प्रतिक्रिया समोर आली आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती. संबंधित तरुणीने तिचं नगमा नाव बदलून सनम ठेवलं आहे. तिने या बदलल्या नावामुळे सर्व घोळ झाला आहे. याबाबत ती म्हणाली, "सनमचं नाव ऐकलं होतं. सनमच्या नावाचे अनेक चित्रपटही पाहिले आहेत. मला नगमा नाव खास पसंत नव्हतं. त्यामुळे मी ते नाव बदलून घेतलं. नाव बदललं तेव्हा मी माझ्या आईलाही सांगितलं नाही. नाव बदल्यानंतर मी आईला सांगितलं." पाकिस्तानात जाऊन लग्न करण्याबाबत सनम म्हणाली, "मी आठवीची परीक्षा देऊन गावी गेले होते. प्रत्येकाचं स्वप्न असतं की सुट्टीत आजीच्या गावी जावं. म्हणून मी गावी गेले. तिथे गेल्यावर माझ्या आईला सगळे म्हणाले की मुलगी तरुण होतेय तिचं लग्न करून टाका. त्यानुसार, माझ्या कुटुंबाने माझं २०१२ मध्ये लग्न लावून दिलं. लग्न झालं तेव्हा माझं वय अवघं १२-१३ वर्षे होतं. मला लग्नाचा अर्थही माहिती नव्हता." हेही वाचा >> ठाण्यातील तरुणीचा पाकिस्तानातील तरुणासोबत निकाह, बनावट कागदपत्रांप्रकरणी तरुणीची चौकशी "प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं शिकण्याचं, तसंच माझंही होतं. पण माझं स्वप्न पूर्ण झालं नाही. तरीही मी तिथे राहिले. माझी आई मला भेटायला यायची नाही. मी सतत येण्याचा हट्ट करेन म्हणून ती भेटायला यायची नाही. तो मला मारहाण करायचा. २०१३ मध्ये मला मुलगी झाली. मुलगी झाल्याने मला तिथंच राहावं लागलं. तरीही तो मला मारायचा. काही काम करत नव्हता. दिवसाला कुठेतरी २०० रुपये कमवून आणायचा. आता यात घर चालत नाही. एवढ्याशा घरात भाऊ वगैरे राहत होते. तिथे भांडणं होत असे. नंतर आई म्हणाली की तिथे त्रास होतोय तर इथे ये राहायला. मी माझ्या नवऱ्याला येथे घेऊन आले. तरीही तो इथे पडून राहायचा. त्याला मुलांशीही काही देणंघेणं नव्हतं. नंतर आईने मला घर घेण्यासाठी पैसे दिले. त्या काळात मी सातवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. माझ्या हॉस्पिटलचा खर्चही माझी आई उचलत होती", अशी कहाणीही सनमने सांगितली. अन् आमच्या लग्नाला घरच्यांनी परवानगी दिली "पाकिस्तानात मी आता गेले. २०१५ ला मी माझ्या मर्जीने नाव बदललं. त्यानंतर मी माझ्या पतीपासून वेगळे झाले. त्यानंतर माझ्या पतीबरोबर काहीही संपर्क राहिला नाही. मधल्या काळात करोना येऊन गेला. २०२१ मध्ये फेसबूकवर माझी बाबर रश्मीद रेहमद याच्याशी ओळख झाली. एक दोन महिने फ्रेंडशीपमध्ये राहून त्यानंतर आमचं प्रेमात रुपांतर झालं. मी माझ्याविषयी त्याला सर्व सांगितलं. त्यानेही सर्वकाही मला सांगितलं. मग आम्ही ठरवलं की आमच्या आमच्या कुटुंबाशी बोलावं. मग आमच्या कुटुंबात एकमेकांत चर्चा झाली. ते म्हणाले की मुलं खूश आहेत तर आम्हीही खूश आहोत", अशाप्रकारे आंतरदेशीय विवाहाला मान्यता मिळाली. #WATCH | Maharashtra: Thane Police filed a case against a 23-year-old woman, who allegedly used fake documents to obtain a passport to travel to Pakistan.Sanam Khan alias Nagma Noor Maqsood says, ".I got my name changed in 2015.During the Covid time, in 2021 I got in… pic.twitter.com/jeyNQ3QRxY— ANI (@ANI) July 24, 2024 मी पाकिस्तानात गेले तेव्हाच चौकशी व्हायला पाहिजे होती "पासपोर्ट वगैरे बनवायला माझ्या आईने मला मदत केली. त्यानंतर मी व्हिसासाठी अर्ज केला. सर्व कागदपत्र पूर्ण होते. ऑनालईनही नाव बदललं आहे. पाकिस्तानात माझं सासर आहे. त्यामुळे तिथे येणं-जाणं राहील. माझ्या आईची प्रकृती चांगली नसल्याने मी येथे आले आहे. पण पोलिसांनी माझी चौकशी सुरू केली आहे. पोलीस चौकशी करत बसले तर मी आईला हॉस्पिटलला कधी घेऊन जाणार? ते मला आठ वाजता सोडतात. मग मी कसं जाणार? मला पुन्हा पुढच्या महिन्यात पाकिस्तानात जायचं आहे. मी सर्व कायदेशीर कागदपत्रे पूर्ण केले आहेत. मी प्रत्येकवेळी पोलिस ठाण्याच्या फेऱ्या करू शकत नाही. ही चौकशी मी गेले तेव्हाच व्हायला पाहिजे. मी जाऊन आले, आणि आता याची चौकशी सुरू केली आहे", अशीही टीका सनमने केली.