ठाणे : ठाणे ते बोरिवली या भुयारी मार्गाच्या प्रकल्पासाठी घोडबंदर येथील कासारवडवली भागातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ सिमेंट काँक्रीट तयार करण्यासाठीचा (आरएमसी) प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे ध्वनी प्रदूषण आणि धुळीचे साम्राज्य पसरत आहे. त्यामुळे येथील रहिवासी संतप्त झाले असून रविवारी येथील नागरिकांनी ‘आरएमसी’ प्रकल्प बंद करण्याची मागणी करत आंदोलन केले. या आंदोलनात पर्यावरणवादी सहभागी झाले होते.

हेही वाचा >>> ठाणे : येऊरमध्ये क्रिकेटप्रेमींचा धिंगाणा; गोंगाटाविरोधात आदिवासी, पर्यावरणवाद्यांचे आंदोलन

ठाणे आणि मुंबईकरांच्या प्रवासाचा खर्च आणि वेळेची बचत व्हावी, यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून ठाणे ते बोरिवली असा भुयारी मार्ग उभारण्यात येत आहे. या कामाकरिता कासारवडवली येथे हावरे सिटी गृहसंकुलाला लागूनच ‘आरएमसी’ प्रकल्प सुरू आहे. तसेच संजय गांधी उद्यानाजवळ हा प्रकल्प आहे. या आरएमसी प्रकल्पाचा सर्वाधिक परिणाम हावरे सिटी गृहसंकुलातील रहिवाशांना सहन करावा लागत आहे.

या गृहसंकुलात ३० हून अधिक इमारती आहेत. तसेच येथे आठ हजारहून अधिक रहिवाशी राहतात. परिसरात एक शाळा देखील आहे. आरएमसी प्रकल्पात दिवस रात्र कामे सुरू असतात. त्यामुळे रात्री ध्वनी प्रदुषण होत असून रहिवाशांची झोपमोड होऊ लागली आहे. ज्येष्ठ नागरिकांना दमा, श्वासोच्छवासाच्या समस्यांचा धोका निर्माण झाला आहे. आरएमसी प्रकल्पात दररोज शेकडो डम्पर राडारोडा घेऊन जात असतात. त्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरत आहे. याशिवाय, या प्रकल्पापासून काही अंतरावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असून आवाजाचा त्रास वन्यजीवांवर होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीत उघड्यावरील दारूच्या दुकानांनी रहिवासी हैराण

रविवारी हावरे सिटी तसेच परिसरातील गृहसंकुलातील काही रहिवाशांनी इमारतीच्या आवारात उतरुन आरएमसी प्रकल्प बंद करा अशी घोषणाबाजी केली. या आंदोलनात लहान मुले, जेष्ठ नागरिक देखील सहभागी झाले होते. तसेच आरएमसी प्रकल्पामुळे नागरिकांच्या आरोग्याला कसा धोका निर्माण होऊ शकतो, याबाबत माहिती देण्यात आली. आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील आंदोलकांची भेट घेतली होती.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतचा भाग पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भाग आहे. असे असतानाही या ठिकाणी आरएमसी प्रकल्प उभारण्यात आला. प्रशासनाने १५ दिवसांत येथील साहित्य हटवावे. अन्यथा राष्ट्रीय हरिद लवादाकडे याचिका दाखल करु.

रोहीत जोशी, पर्यावरणवादी कार्यकर्ते.

हेही वाचा : डोंबिवली, भिवंडीत गुटखा विक्री, हुक्का पार्लर चालविणाऱ्या मालकांवर गुन्हे

आरएमसी प्रकल्पामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे रहिवाशांनी आंदोलन केले. येत्या काही दिवसांत आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल.

डाॅ. श्रद्धा रावराणे, रहिवासी, हावरे सिटी.