ठाणे : लोकप्रिय संगीतकार डीजे मार्टिन गॅरिक्स याच्या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी, १४ मार्चला नवी मुंबई येथील डाॅ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून नागरिक नवी मुंबईत येण्याची शक्यता आहे. या कालावधीत वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतुक पोलिसांनी वाहतुक बदल लागू केले आहेत. ठाण्यातून नवी मुंबईत वाहतूक करणारी अवजड वाहने ठाण्याच्या वेशीवर रोखली जाणार आहेत. शुक्रवारी दुपारी २ ते रात्री १२ पर्यंत हे वाहतुक बदल कायम असणार आहेत.

धुलिवंदन निमित्ताने ‘वर्ल्ड बिगेस्ट होली’ या कार्यक्रमाचे आयोजन नेरूळ येथील डाॅ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. या कार्यक्रमास लोकप्रिय संगीतकार डीजे मार्टिन गॅरिक्स हे येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमास देशभरातील विविध भागातून नागरिक येण्याची शक्यता आहे. या कालावधीत नवी मुंबईत वाहतुक कोंडी टाळण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी विविध वाहतुक बदल आखले आहेत. त्यामुळे ठाणे पोलिसांनीही वाहतुक बदल लागू केले आहेत. अवजड वाहनांना शुक्रवारी नवी मुंबईत प्रवेशबंदी असल्याने ही वाहने ठाण्याच्या वेशीवर थांबणार आहेत.

ठाणे वाहतुक पोलिसांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार, मुंबई, वसई, विरार येथून घोडबंदरमार्गे ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना फाऊंटन हाॅटेलजवळ आणि घोडबंदर येथून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना गायमुख येथे प्रवेशबंदी असेल. बाळकूम, साकेत, कळवा,विटावा मार्गे नवी मुंबई जाणाऱ्या जड अवजड वाहनांना कळवा नाका येथे प्रवेशबंदी असेल. खारीगाव टोलनाका, गॅमन जंक्शन, पारसिक चौक, मुंब्रा बाह्यवळण मार्गे नवी मुंबई वाहतुक करणाऱ्या जड अवजड वाहनांना पारसिक चौक येथे प्रवेशबंदी असेल.

पनवेल येथून कल्याण-शीळफाटा मार्गे महापेच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना शीळफाटा येथे प्रवेशबंदी असेल. भिवंडी शहरातून उरण जेएनपीटी बंदराच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना भिवंडी कल्याण मार्गावरील रांजनोली येथे तर सोनाळे येथून उरण जेएनपीटीच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना बासुरी हाॅटेल येथे प्रवेशबंदी असेल. कल्याण येथून उरण जेएनपीटी बंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना पत्रीपूल येथे प्रवेशबंदी असेल. बदलापूर, अंबरनाथ येथून बदलापूर जलवाहिनी मार्गे काटई चौक, तळोजा बाह्यवळण मार्गे नवी मुंबईत वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना खोणी निसर्ग नाका येथे प्रवेशबंदी असेल. हे वाहतुक बदल शुक्रवारी दुपारी २ ते रात्री १२ यावेळेत लागू असतील.